Sadabhau Khot : गोरक्षकांची धक्काबुक्की, सदाभाऊंची डबल ढोलकी? सत्तेत माझा वा़टा तरी धोक्यात गावगाडा? खोतांचा आरोप काय?
सत्ताधारी होऊन देखील सदभाऊ खोतांचा गावगाडा सुरक्षित नसल्याचे चित्र आहे. गोरक्षकांविरोधात आंदोलन केल्यानंतर पुण्यामध्ये सदभाऊ खोत यांना धक्काबुकीचा प्रयत्न झालाय. नेमका वाद काय आहे?
पुण्यात पुरसुंगी मधल्या द्वारकाधीश गोशाळेजवळचा हा प्रकार आहे. राज्यात काही गोरक्षकांकडून लूटमार सुरू असल्याचा आरोप सदभाऊ खोत काही दिवसांपासून करत आहेत. अनेक शेतकर्यांच्या गाई म्हशी पुण्यातल्या द्वारकाधीश गोशाळेत नेण्यात आल्या होत्या. तिथे पाहण्यासाठी सदभाऊसह शेतकरी पोहोचले. मात्र प्रत्यक्षात तिथे म्हशी नव्हत्याच आणि त्याच वेळेस सदभाऊ खोतांवर गोरक्षकांकडून हल्ल्याचा प्रयत्न झाला. काही वर्षांपूर्वी कर्मठ हिंदुत्ववादी झालेले सदभाऊंचे मित्र गोपीचंद पडळकर यांची यावर नेमकी भूमिका काय? गाई म्हशींबद्दल हिंदुत्ववादी खरे बोलतायत की मग मित्र खरा बोलतोय यावर पडळकरांनी मात्र मौन बाळगले. दुसरीकडे सारा कायदा धाब्यावर बसवला गेला असून गोरक्षकांच्या कारभारातील पोलिसांचीही मिलीभगत असल्याचा आरोप सदभाऊ करतायत. मात्र याला जबाबदार कोण? पाठबळ कुणाचे असे प्रश्न विचारल्यावर सदभाऊ खोत हे थेटपणे काहीही बोलत नाहीयेत.
शेतकरी अनेक गाई म्हशी चाऱ्याभावी सांभाळ्यासाठी गोरक्षकांना देतात. काही जनावरांचा खरेदी विक्रीचा व्यवहार सुद्धा होतो. मात्र आरोपानुसार गोरक्षकांकडून ती सुद्धा वाहन अडवून गुरे जप्त करतात. खोतांच्या आरोपानुसार जप्त केलेली गुरे राज्यातल्या ठराविक गोशाळांमध्ये नेली जातात. या सार्यात शेतकर्यांना एकही रुपया मिळत नाही. प्रत्यक्षात शेतकरी जेव्हा गोशाळेत जातात तेव्हा तिथे त्यांची गुरे नसतात. त्यामुळे आतापर्यंत गोशाळेत किती जनावर जप्त करून दिली गेली? जप्त केलेली किती जनावर गोशाळेत जगली किंवा मेली? त्याची विल्हेवाट कशी लावली गेली याची एक श्वेतपत्रिका काढण्याची मागणी सदभाऊ खोतांनी केली.
