केंद्र सरकारकडे मराठी भाषेच्या अभिजाततेचे अनेक पुरावे दिले. वारंवार पाठपुरावा केला. मात्र, सर्व निकष पूर्ण करूनही केंद्र सरकार मराठीला अभिजाततेचा दर्जा देत नाही. त्यामुळे आता जनतेच्या न्यायालयात हा लढा लढण्याची गरज आहे. त्यासाठी मराठी भाषकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन शुक्रवारी उद्योगमंत्री तथा मराठी भाषामंत्री सुभाष देसाई (Sabhash Desai) यांनी केले. देसाई यांच्या हस्ते साहित्य संमेलनातील मध्यवर्ती हिरवळीवर अभिजात मराठी दालनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला विशेष पाहुणे म्हणून साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित, मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मराठी भाषा विभागाचे सहसचिव मिलिंद गवांदे, ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, मंत्री छगन भुजबळ, प्रा. हरी नरके, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, हेमंत टकले, समीर भुजबळ, पंकज भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.