Raj Thackeray : मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून साधला निशाणा?
मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि ईव्हीएममुळे भाजपमध्ये माज आल्याचा आरोप केला. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव रचला जात असल्याचा दावा करत, त्यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा मांडला. भंडारा येथेही ईव्हीएमच्या कथित गैरवापरावरून सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला.
मुंबईतील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात आयोजित मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना, ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) मुळे भाजपमध्ये माज आल्याचा आरोप केला. त्यांनी पुन्हा एकदा मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला.
मुंबई महापालिकेतील मराठी आणि मुंबई हाच ठाकरे बंधूंचा मुख्य मुद्दा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. याच मेळाव्यातून राज ठाकरेंनी ईव्हीएमवरही संशय व्यक्त केला. महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पंतप्रधानांनी प्रचाराला येण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे, भंडारा जिल्ह्यातही ईव्हीएमच्या कथित गैरवापरावरून भाजप वगळता सर्व पक्षांनी निषेध मोर्चा काढला. नगर परिषदेच्या निवडणुकीत एका उमेदवाराचे नाव ईव्हीएममधून गायब झाल्याचा आरोप करत, प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली. या घटनेत शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकरही सहभागी झाले होते, ज्यातून ईव्हीएमवरील संशयाचे राजकारण तापल्याचे दिसून येते.
