महाविकास आघाडीने शेतकरी हल्ल्याविरोधात महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनी सहभाग नोंदवला आहे. मात्र भाजप आणि मनसेने (MNS) या बंदला तीव्र विरोध केला आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी या बंदवरुन ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. संसदेत शेतकरी कायदा बिल पास होत असताना महाविकास आघाडीचे खासदार शेपूट घालून बसले होते का? शिवसेना खासदारांची थोबाडं बंद का होती ? पवारसाहेब संसदेत अनुपस्थित होते, त्याचे कारण काय? असे सवाल संदीप देशपांडे यांनी केले. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
संदीप देशपांडे म्हणाले, “आज लॉकडाऊनमुळे लोकांचे कंबरडे मोडले आहे. सणासुदीच्या दिवसात थोडा-बहुत व्यापार होतो. अशा दिवसांत तुम्ही बंद करता आहात? हा स्टेट स्पॉन्सर्ड बंद आहे. पोलोस लोकांची दुकाने बंद करीत आहेत. ही कुठली पद्धत? मावळमध्ये पोलिसांनी शेतकऱ्यांवर गोळीबार केला तेव्हा समाजवादी पार्टी आणि मायवतींच्या पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये बंद केला का ?”