ठाणे : सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीवरून सर्वच पक्षांची मोर्चे बांधणी सुरू आहे. याचदरम्यान राज्यातील भाजप- शिवसेना युतीत मिठाचा खडा पडला आहे. येथे युतीतच विघ्न निर्माण झाले आहे. कल्याण लोकसभा मतदार संघातच लोकसभा निवडणुकीवरून ठिणगी पडल्याचे समोर येत आहे. तर येथे भाजप कायकर्ते सांगतील, तोच उमेदवार अशी भुमिका भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यावरूनच आता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी थेट आपली नाराजी आणि प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, केंद्रात पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना युती आणि मित्र पक्षाचे सरकार स्थापन करण्याचे आमचे ध्येय आहे. त्याच दिशेने आम्ही काम करत आहोत. करत असलेल्या कामांना जर कुणाचा विरोध असेल, कुणाला पोटदूखी होत असेल आणि युतीमध्ये जर विघ्न निर्माण होत असेल तर मी माझ्या पदाचा राजीनामा देतो. तशी आपली तयारी असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे ठाण्यातच आता भाजप आणि शिवसेना त्यांच्यात जोरदार लागल्याचं पहायला मिळत आहे.