मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी जनतेशी संवाद साधत राज्यातील निर्बंध हळूहळू शिथिल करणार असल्याची माहिती दिली. कोरोना लशीचे दोन डोस घेतलेल्यांना मुंबईमध्ये लोकल ट्रेनमधून प्रवासाची मुभाही देण्यात आली आहे. पण दुसरीकडे राज्यात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची चर्चा सुरु असल्याने मुंबईकरांना सावधानतेचा इशारा महापौर किशोरी पेडणेकरांनी दिला आहे. तज्ज्ञांच्या मते मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मुंबईकरांनी काळजी घेण्याची गरज असल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे.
मुंबईत करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. ही लाट रोखण्यासाठी मुंबईत पुन्हा सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आरोग्य केंद्रे, दवाखाने, सार्वजनिक शौचालये, झोपडपट्ट्या, चाळी आणि अरुंद गल्ल्यांमध्ये फवारणी करुन त्या निर्जंतुक करण्याचा पालिकेचा प्लॅन आहे. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ही फवारणी करण्यात येणार आहे.