नागपूर : सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेनेकडे असलेल्या महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळानं राबवलेल्या निविदा प्रक्रियेवर काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आला आहे. यासंदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय. महाजनको कंपनीला कोळसा पुरवणाऱ्या कोळसा वॉशिंगच्या कंत्राटाच्या निविदेवर पटोले यांनी आक्षेप घेतला आहे. संजय हरदानी चालवत असलेल्या रुखमाई इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी गैरमार्गाने पात्र ठरल्याचा आक्षेप पटोले यांनी घेतला आहे. (Nana Patole has objection on the tender process of Mining Corporation which belongs to ShivSena)
महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ रुखमाई इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला जे कंत्राट देण्यात येणार आहे, त्याला स्थगिती देण्याची मागणी नाना पटोले यांनी केलीय. या महामंडळाच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे आमदार आशिष जयस्वाल आहेत. राज्यात महाविकास आघाडीच्या बॅनरखाली शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सत्तेत आहेत. अशावेळी नाना पटोले यांनी शिवसेनेकडे असलेल्या महामंडळाच्या निविदा प्रक्रियेवर आक्षेप घेतल्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, नाना पटोले यांनी ऊर्जा विभागाच्या विरोधात पत्र लिहिल्याची बातमी व्हायरल होत होती. त्यावर खुद्द पटोले यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे. आपण ऊर्जा विभागात्या विरोधात पत्र लिहिल्याची बातमी पूर्णपणे असत्य आणि चुकीची आहे. आपले पत्र हे खनिकर्म महामंडळातील टेंडरबाबत आहे. या महामंडळाचा ऊर्जा विभागाशी काहीही संबंध नाही, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.
मी ऊर्जा विभागाच्या विरोधात पत्र लिहिल्याची @abpmajhatv ने दाखवलेली बातमी पूर्णपणे असत्य व चुकीची आहे. माझे पत्र हे खनिकर्म महामंडळातील टेंडरबाबत आहे या महामंडळाचा ऊर्जा विभागाशी काही संबंध नाही. pic.twitter.com/oyfcXBC9Sz
— Nana Patole (@NANA_PATOLE) July 1, 2021
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटलं होतं. त्यावेळी त्यांनी दिलेल्या निवेदनातील तिनही विषय महत्वाचे असल्याचं एक पत्र राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. राज्यपालांच्या या पत्रावरुन नाना पटोले यांनी राजपाल आणि भाजपवर खोचक शब्दात टीका केलीय. राजभवन हे एकप्रकारे भाजपचं कार्यालय झालंय. देशात पहिल्यांदाच असं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यपाल हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे वागत आहेत, असा घणाघात पटोले यांनी केलाय.
त्याचबरोबर राज्यपाल हे संविधानिक पद आहे आणि त्याचा सन्मान आहेच. राज्यपालांचे काम काय असतं हे मला सांगण्याची गरज नाही. राज्यपालांच्या सांगण्यावरुन विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लावली जात आहे, हे सांगण्याचं काम भाजप करत आहे. विधानसभा अध्यक्ष निवडणूक पावसाळी अधिवेशनातच होणार, येत्या 5 तारखेला विधानसभा अध्यक्षाच्या नावाची घोषणा होईल असं सांगतानाच काँग्रेसमध्ये कुठलीही अंतर्गत नाराजी नसल्याचा दावाही पटोले यांनी केला आहे.
संबंधित बातम्या
(Nana Patole has objection on the tender process of Mining Corporation which belongs to ShivSena)