औरंगाबाद : राज्यात कांद्याला दर मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्याला आपल्याच खिशातले पैसे अडत्याला देण्याची वेळ आली आहे. यावरून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आजच नाशिक येथे शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरत टिका केली होती. तसेच यावर लवकर तोडगा आढा अन्यथा आपल्यालाच आंदोलन करावं लागेल असा इशारा दिला होता. त्यानंतर आता कांदा उत्पादक शेतकरी हा चांगलाच आक्रमक झाला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याला भाव मिळवण्यासाठी महामार्ग रोखला. त्यांनी धुळे-सोलापूर महामार्गावर रस्ता रोको करत आंदोलन केलं आहे. हा रस्ता रोको हातनूर टोलनाक्यावर करण्यात आला. तर कांद्याला रास्त भाव देण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.