भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ भाजपने विधिमंडळ परिसरात जोरदार आंदोलन केले. सोबतच राज्यातील विविध ठिकाणी देखील भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली. नागपुरात भाजप प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्त्वात हे आंदोलन केलं गेलं. यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले पाहायला मिळाले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडी सरकारच्या नेते, मंत्र्यांचे पुतळे जाळण्यात आले. नागपुरातील बडकस चौकात हे आंदोलन झालं.
महाराष्ट्र सरकारने विधानमंडळाचा वापर करुन जुलूमशाही केली, हुकूमशाही केली आणि 12 आमदारांना निलंबित केलं. महाराष्ट्र सरकारने विधीमंडळाचा वापर राजकीय कामांसाठी केला. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या मनात तीव्र रोष आहे. राज्यातील दीड हजार ठिकाणी कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. जोपर्यंत त्या 12 आमदारांचं निलंबन रद्द होत नाही तोपर्यंत राज्यात आंदोलन सुरु राहील. महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन ठराव घेतला आहे. विधान मंडळाचा वापर राजकारणाकरिता केलाय, अशी टीका भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.