हवाई प्रवासाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! हेलिकॉप्टर प्रवासाचं नेत्यांना टेन्शन?
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेनंतर नेत्यांच्या हवाई प्रवासाच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे. नुकत्याच पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने उड्डाण रद्द करावे लागले. सुदैवाने वेळीच बिघाड लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनांमुळे खासगी हेलिकॉप्टरच्या देखभालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अजित पवारांच्या घटनेच्या चौकशीची मागणी जोर धरत आहे.
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेनंतर महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या हवाई प्रवासाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली. पंकजा मुंडे जिल्हा परिषद प्रचारानिमित्त छत्रपती संभाजीनगरहून लातूरला हेलिकॉप्टरने जाणार होत्या, मात्र उड्डाणापूर्वीच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. यामुळे त्यांचे उड्डाण रद्द करण्यात आले आणि दुसऱ्या हेलिकॉप्टरची व्यवस्था करावी लागली. सुदैवाने हा बिघाड वेळीच लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली.
या घटनेनंतर पंकजा मुंडे यांनी हवाई प्रवासाची भीती व्यक्त केली, अनेक कार्यकर्ते त्यांना विमान किंवा हेलिकॉप्टर न वापरण्याची विनंती करत असल्याचे सांगितले. तसेच, हेलिकॉप्टरच्या देखभाल करणाऱ्या एजन्सींच्या कार्यक्षमतेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “रिक्षासारखा वापर हेलिकॉप्टरचा होतोय,” असे विधान करत त्यांनी खासगी हवाई प्रवासातील वाढत्या अपघातांवर चिंता व्यक्त केली. त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना खासगी हवाई प्रवास टाळण्याची विनंती करणार असल्याचेही नमूद केले.
