Parth Pawar Land Deal : पार्थ पवार सुटले? जमीन व्यवहारच रद्द, दादांचा स्फोटक खुलासा अन् चर्चांना उधाण
पार्थ पवारांच्या कंपनीने पुण्यातल्या वादग्रस्त ४० एकर जमिनीचा व्यवहार रद्द केला आहे. या व्यवहारात एकही रुपयाचा आर्थिक व्यवहार झाला नसल्याचा दावा अजित पवारांनी केला. ही जमीन मूळची महारवतनाची सरकारी असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, महसूल सचिवांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे.
पुण्यातील पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून निर्माण झालेला वाद आता नवी दिशा घेत आहे. ज्या ४० एकर जमिनीच्या व्यवहारावरून पार्थ पवारांवर घोटाळ्याचे आरोप झाले होते, तो व्यवहारच त्यांच्या कंपनीने रद्द केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या व्यवहारात एक रुपयाचाही आर्थिक व्यवहार झाला नसल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे. १८०० कोटी रुपये किंमतीची जमीन ३०० कोटी रुपयांत, तर केवळ ५०० रुपये स्टॅम्प ड्युटी भरून व्यवहार झाल्याचा आरोप होता.
अजित पवारांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त आणि इतर मान्यवरांच्या समितीला एक महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या व्यवहारात पैसेच दिले नसताना जमिनीची रजिस्ट्री कशी झाली, हा प्रश्न उपस्थित झाला असून, संबंधित विभागांकडून याचा तपास केला जाईल. या प्रकरणी दोन पोलीस ठाण्यांत एफआयआर दाखल झाले असले तरी, मुख्य संचालक असलेल्या पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झालेला नाही, ज्यांनी सह्या केल्या त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याचे अजित पवार म्हणाले.
