Rahul Gandhi | स्टुडंट, इडियट, अंधभक्त… राहुल गांधींच्या एका वक्तव्याने सभागृहात प्रचंड गदारोळ
लोकसभेत अँटी पेपर लीक दुरुस्ती विधेयकावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भाषणामुळे सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांशी झालेल्या संवादाचा संदर्भ देताना राहुल गांधी यांनी केलेल्या एका विधानावर सत्ताधारी सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला.
लोकसभेत अँटी पेपर लीक दुरुस्ती विधेयकावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भाषणामुळे सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांशी झालेल्या संवादाचा संदर्भ देताना राहुल गांधी यांनी केलेल्या एका विधानावर सत्ताधारी सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला.
भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी झालेल्या चर्चेचा उल्लेख करत “स्टुडंट, इडियट आणि अंधभक्त” अशा तीन प्रकारांचा संदर्भ दिला. या विधानावर सत्ताधारी खासदारांनी आक्षेप नोंदवत ते असंसदीय असल्याचा दावा केला. मात्र, राहुल गांधी यांनी संबंधित शब्द असंसदीय नसल्याचं सांगत आपलं भाषण पुढे सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधींवर असंसदीय भाषेचा वापर केल्याचा आरोप केला. त्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हस्तक्षेप करत संबंधित शब्द संसदेच्या कामकाजातून वगळण्याची मागणी केली. यानंतर सभागृहात काही काळ गोंधळ निर्माण झाला.
गोंधळानंतर पुन्हा बोलताना राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी झालेल्या संवादाचा उल्लेख केला. “विद्यार्थी म्हणजे ज्याचा विचार खुला असतो आणि ज्याला आपण सर्वकाही जाणत नाही, याची जाणीव असते,” असा विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेला दृष्टिकोन त्यांनी सभागृहात मांडला. विद्यार्थी सत्याच्या शोधात असतो आणि समाजातील बदल समजून घेण्याचा प्रयत्न करतो, असंही त्यांनी सांगितलं.
यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरही प्रश्न उपस्थित केला. अँटी पेपर लीक दुरुस्ती विधेयकासारख्या महत्त्वाच्या चर्चेदरम्यान पंतप्रधान सभागृहात उपस्थित नसल्याची टीका करत, त्यांनी या विषयावर सरकारने थेट उत्तर द्यावं, अशी मागणी केली.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संसदेत जोरदार शाब्दिक चकमक झाली असून, अँटी पेपर लीक विधेयकावरील चर्चेसोबतच या विधानाचीही राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
