नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 3 दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी नाशिकमधील शेतकऱ्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. नाशिक जिल्हा बँक काही दिवसांपासून कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांकडून सक्तीने वसुली करत असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच आम्ही कर्ज भरण्यास तयार आहोत, मात्र काहीसा दिलासा मिळावा अशी मागणी घेऊन शेतकऱ्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. यावर राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांनाही प्रतिप्रश्न करत, ‘तुम्ही अडचणीच्या काळात माझ्याजवळ येतात, मात्र मतदान मला करत नाही. मग माझ्याकडे का येतात? ज्यांनी टोलमुक्त महाराष्ट्र करू, असे आश्वासन दिले होते, त्यांनाच तुम्ही मतदान केलं का? जे तुमची पिळवणूक करता, त्यांनाच तुम्ही मतदान करता.याचं भान तुम्ही ठेवायला हवं’, असे खडेबोल देखील सुनावले. यावर शेतकऱ्यांनी आम्ही सगळे तुमच्यासोबत असल्याचे आश्वासन दिले.