रत्नागिरी : दरड कोसळल्याने परशुराम घाट (Parshuran Ghat in Ratnagiri) अद्यापही बंदच आहे. 20 तासांपासून परशुराम घाट बंद असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. चिपळूण चिरणी लोटे मार्गे वाहतूक सुरू असून आता परशुमराम घाट बंद असल्यानं वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात आली आहे. अवजड वाहनांना वाहतूक (Mumbai Goa Highway) बंद करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनं हायवेवर थांबली आहे. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. रत्नागिरीला गेल्या दोन दिवसांपासून पावसानं झोडपून (Konkan Heavy Rain) काढलंय. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, चिपळूण, परशुराम घाट या भागात मुसळधार पाऊस झाला आहे. तर येत्या 48 तासांत पावसाचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर लोकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. परशुराम घाटात सोमवारी दुपारच्या सुमारास दरड कोसळली होती. तेव्हापासून या भागातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे.