सचिन आहिर यांच्यानंतर ‘उबाठा’तील सर्वच आमदार… आदित्य ठाकरेंचं नाव घेत बड्या नेत्याचं खळबळजनक विधान
राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी शिंदे गटाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय चर्चांना वेग आला आहे.
राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी शिंदे गटाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय चर्चांना वेग आला आहे. अत्यंत गोपनीय पद्धतीने हा अर्ज दाखल करण्यात आल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होते.
दरम्यान, शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी यावर सूचक विधान करत ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. सचिन अहिर यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाबाबत बोलताना शिरसाट म्हणाले की, बालेकिल्ल्यातूनच जर मोठे नेते ‘उबाठा’ला धक्का देत असतील तर हे ढासळलेल्या नेतृत्वाचे लक्षण आहे. तसेच आदित्य ठाकरे वगळता इतर सर्व आमदार शिंदे गटात येतील, असा आमचा अंदाज असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिंदे गटातील इनकमिंग जोरात सुरू असल्याचा दावा देखील संजय शिरसाट यांनी केला आहे. त्यामुळे आगामी काळात ठाकरे गटाला आणखी धक्के बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
