गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण…
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यामुळे गणेशोत्सवात पोलिसांवर ताण येत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. शहा ५५० पोलीस आणि २८ गाड्यांच्या सुरक्षा ताफ्यासह फिरतात, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, राऊत यांनी "एवढी भीती कोणाची?" असा सवाल विचारला. मुंबईत पोलिसांची आधीच कमतरता असताना ही सुरक्षा व्यवस्था अनावश्यक असल्याचे राऊतांचे म्हणणे आहे.
संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. गणेशोत्सवाच्या काळात शहांच्या मुंबई भेटीमुळे आधीच व्यस्त असलेल्या मुंबई पोलिसांवर अनावश्यक ताण येत असल्याचे राऊत म्हणाले. गृहमंत्र्यांना हे सामान्य ज्ञान नसेल का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राऊत यांच्या मते, अमित शहा एकटे फिरत नाहीत; त्यांच्यासाठी चार-चार रस्ते दोन-दोन तास बंद केले जातात, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतो.
शहांच्या ताफ्यात ५५० पोलीस आणि २८ सुरक्षा गाड्या असतात, ज्यात चिलखती गाड्या आणि विविध प्रकारची शस्त्रे असतात. “कोण मारतंय यांना? असं यांनी काय महान राष्ट्रकार्य केलंय की यांना धोका आहे?” असा उपरोधिक सवाल राऊत यांनी विचारला. दहशतवादी आणि हुकूमशहालाच धोका असतो, असेही राऊत म्हणाले. मुंबईत पोलिसांचा तुटवडा असताना आणि नागरिक कामात गुंतलेले असताना, गृहमंत्र्यांनी येथे डेरा टाकल्याबद्दल राऊत यांनी नाराजी व्यक्त केली.
