Sanjay Raut | शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राजकीय प्रवास कलंकित, राऊतांचा सचिन अहिरांवर घणाघात
शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांच्या पक्षांतरानंतर आता माजी मंत्री सचिन अहिर यांनीही शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने राज्यातील राजकारण आणखी तापले आहे. या घडामोडीनंतर ठाकरे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सचिन अहिर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांच्या पक्षांतरानंतर आता माजी मंत्री सचिन अहिर यांनीही शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने राज्यातील राजकारण आणखी तापले आहे. या घडामोडीनंतर ठाकरे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सचिन अहिर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
सचिन अहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी निवड होण्याची औपचारिक घोषणा अद्याप बाकी असताना राऊत यांनी त्यांच्या राजकीय वाटचालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी अहिर यांचा राजकीय प्रवास वादग्रस्त आणि कलंकित असल्याचा आरोप करत त्यांच्या पक्षांतरावर टीका केली.
संजय राऊत म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना सचिन अहिर यांनी शरद पवार यांना कोणतीही कल्पना न देता शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळीही त्यांनी आपल्या राजकीय भविष्यासाठी निर्णय घेतला होता. त्यामुळे, “जे शरद पवार यांचे झाले नाहीत, ते आमचे कसे होतील?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राऊत यांनी पुढे सांगितले की, शिवसेना, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी सचिन अहिर यांना पक्षात योग्य सन्मान आणि जबाबदाऱ्या दिल्या. त्यांना भेटण्यासाठी वेळ दिला जात नव्हता किंवा त्यांचे म्हणणे ऐकले जात नव्हते, असा दावा करणे योग्य ठरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आदित्य ठाकरे आणि सचिन अहिर यांची नियमित भेट होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सचिन अहिर यांनी आपल्या राजकीय भविष्यासाठी पक्ष सोडल्याचे सांगितले असले, तरी या निर्णयामागील कारणांवरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना अधिक वेग आला आहे. त्यांच्या पक्षांतरामुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या चर्चांना उधाण आले असून या प्रकरणावर पुढे आणखी प्रतिक्रिया येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
