राम मंदिरावर बोलले… पण सिद्धिविनायकवर प्रश्न येताच संजय राऊतांनी उत्तर टाळलं!
बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपच्या झालेल्या पराभवानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. या निकालाचे विश्लेषण करताना त्यांनी भाजपची लोकप्रियता घटल्याचा दावा केला आणि या पराभवामागे जनतेतील नाराजी कारणीभूत असल्याचे म्हटले.
बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपच्या झालेल्या पराभवानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. या निकालाचे विश्लेषण करताना त्यांनी भाजपची लोकप्रियता घटल्याचा दावा केला आणि या पराभवामागे जनतेतील नाराजी कारणीभूत असल्याचे म्हटले.
माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, “देशात सध्या निर्माण झालेल्या वातावरणाचा परिणाम बांकीपूरच्या निकालात स्पष्ट दिसून आला आहे. 1995 पासून भाजप जिंकत असलेली आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी यापूर्वी मोठ्या मताधिक्याने जिंकलेली जागा पक्षाला राखता आली नाही. हा निकाल भाजपसाठी धोक्याचा इशारा आहे.”
राऊत यांनी पुढे जंतर-मंतरवरील Gen Z आंदोलन, राम मंदिरातील कथित चोरीच्या घटना आणि इतर मुद्द्यांचा उल्लेख करत, या सर्व घडामोडींमुळे मतदारांमध्ये नाराजी वाढल्याचा दावा केला. बिहारच्या जनतेच्या राजकीय जाणिवांमुळे या निवडणुकीत भाजपला फटका बसल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, राम मंदिरातील कथित चोरीच्या मुद्द्यावर भाष्य करणाऱ्या संजय राऊत यांना सिद्धिविनायक मंदिरातील कथित गैरव्यवहाराबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले. “या विषयाची मला पुरेशी माहिती नाही. हा तांत्रिक विषय आहे. मी या प्रकरणाचा सखोल अभ्यास केलेला नसल्यामुळे त्यावर भाष्य करणार नाही,” असे स्पष्ट उत्तर त्यांनी दिले.
बांकीपूर पोटनिवडणुकीच्या निकालानंतर आणि संजय राऊत यांच्या वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, त्यांच्या टीकेला भाजपकडून काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.