नागपूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तांवर ईडीने कारवाई केल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपमध्ये सर्वच चांगले आहेत का? असा एकही व्यक्ती भाजपमध्ये नाहीये का? भाजप नेते रस्त्यावर हातात कटोरा घेऊन भीक मागत आहेत का? सर्वच रस्त्यावर बसून भीक मागत आहेत का? कुणी चने विकतंय, कुणी भेळपुरी विकतंय, कुणी पावभाजींची गाडी लावून जगत आहेत असं काही आहे का?, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. तुमच्याकडे काय आहे. तुम्ही जे शकडो हजारो कोटी खर्च करून निवडणुका लढत आहात तो पैसा कुठून येतो. तुमचे इमले, बंगले कसे उभे राहिले. आम्ही दिलेले कागदपत्रे पुरावे ठरत नाहीत, पण तुमचे चिटोरे पुरावे ठरतात. हा न्याय नाही. परत परत सांगतो, घाई नाही. पण सर्व समोर येईल. मोकळेपणाने श्वास घेण्याच्या स्वातंत्र्यावरचं हे संकट आहे. पण हे काही काळच राहणार, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.