मुंबई : ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी साद घातली तर… या प्रश्नावर साद येऊ देत तेव्हा बघू, असं उत्तर राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी दिलंय. शर्मिला ठाकरे पुण्यात एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यावर पहिल्यांदाच त्यांनी शिवसेनेतली फूट, आदित्य ठाकरेंचे दौरे या विषयांवर बोलताना ठाकरे बंधू एकत्र येण्याची साद घातली गेली तर काय कराल, या प्रश्नावर उत्तर दिलं. बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतरही दोन्ही बंधू एकत्रित येण्याची चर्चा झाली. मात्र ती चर्चाही पुढे जाऊ शकली नाही.
जेव्हा मनसेला गळती लागली होती. तेव्हा संपलेल्या पक्षांवर काय बोलावं म्हणून शिवसेना नेते टीका करत होते. याआधी मनसेचे जुन्नरचे एकमेव आमदारही शिवसेनेनं घेतले. नंतर मुंबईत मनसेच्या 7 पैकी 6 नगरसेवकांना फोडलं. तेव्हा राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली होती.