लखीमपूरमधील एक व्हिडीओ सध्या व्हायरल झालाय. त्यात एक जीप शेतकऱ्यांना चिरडून पुढे जात असल्याचं पाहायला मिळत आहे. देशातील अनेक बड्या नेत्यांनी हा व्हिडीओ ट्वीट करुन पंतप्रधान मोदी आणि भाजपवर निशाणा साधलाय. इतकंच नाही तर दोन दिवसांपासून नजरकैदेत असलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संजय राऊत आणि राहुल गांधी यांची होणारी भेट महत्वाची मानली जात आहे.
लखीमपूर हिंसाचारामुळे देश हादरला आहे. प्रियंका गांधी यांना यूपी सरकारनं अटक केलीय. विरोधी नेत्यांना शेतकऱ्यांना भेटण्यास मज्जाव करण्यात येतोय. उत्तर प्रदेश सरकारकडून सुरु असलेल्या दडपशाही विरोधात संयुक्त विरोधी कारवाईची गरज आहे. राहुल गांधी यांना दुपारी सव्वा चार वाजता भेटणार आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे दिलीय.