अलिबाग: रश्मी ठाकरे या 19 बंगले नावावर करण्यासाठी कोर्लई ग्रामपंचायतीला पत्रं देतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बंगल्यांबाबत काहीच बोलत नाहीत. सरपंच मात्र बंगलेच अस्तित्वात नसल्याचं सांगतात. मग यापैकी खरे कोण? रश्मी ठाकरे, मुख्यमंत्री की सरपंच? असा सवाल करतानाच मुख्यमंत्र्यांनी खुर्ची वाचवण्यासाठी मिसेस रश्मी ठाकरे यांच्याशी गद्दारी केली आहे का? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. तसेच सत्य बाहेर येण्यासाठी या प्रकरणाचा तपास करण्यात यावा अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे. सोमय्या यांनी आज रेवदंडा पोलीस ठाण्यात येऊन तसा अर्जही दिला आहे. सोमय्या आधी कोर्लई गावात आले. या ठिकाणी ग्रामसेवकाला निवेदन दिल्यानंतर ते थेट रेवदंडा पोलीस ठाण्यात आले आणि पोलिसांनाही या प्रकरणाचा तपास करावा म्हणून एक अर्ज दिला आहे.