माफी मागा, नाही तर अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, अशी धमकीच भाजपचे खासदार ब्रृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना दिलीय. विशेष म्हणजे यावर भाजप, समन्वय साधून मार्ग काढण्यावर बोलत आहे..तर स्वत: मनसेचे नेते मात्र उघडपणे काहीही बोलत नाहीयत. ऐरव्ही राज ठाकरेंवर सोशल मीडियातून जरी टिप्पणी झाली की मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मारझोड करतात. मात्र ब्रृजभूषण यांच्या धमकीनंतरही मनसेचे नेते प्रत्युत्तर देत नाही आहेत. माफीच्या मागणीवर राज ठाकरेच बोलणार, एवढी एकवाक्यता मनसेच्या नेत्यांमध्ये आहे. आता महाराष्ट्रातले भाजपचे नेते काय म्हणतायत, ते ऐका. देवेंद्र फडणवीस, स्वत: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ किंवा केंद्रीय नेतृत्वाच्या माध्यमातून मार्ग काढण्यात येईल, असं भाजपच्या नेत्यांना वाटतंय. विशेष म्हणजे ब्रृजभूषण यांची समजूत काढण्यासाठी हालचालीही सुरु झाल्यात..भाजपचे नेते आणि बिहार सरकारचे मंत्री शाहनवाज हुसैन यांनी ब्रृजभूषण यांची भेटही घेतली.
मात्र शाहनवाज हुसैन यांनी बैठकीनंतर व्यक्तिगत कार्यक्रमासाठी आल्याचं सांगून त्यांनीही अधिक बोलणं टाळलं. ब्रृजभूषण सिंहांनीही अशी भूमिका घेतली शिवसेनेलाही टीकेची संधी मिळाली. राज ठाकरे 5 जूनला अयोध्येत जाणार आहेत..तर 10 जूनला आदित्य ठाकरेही अयोध्येत येऊन रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत. मात्र आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला ब्रृजभूषण सिंहांनी विरोध केलेला नाही. त्यामुळं आता असली नकली कोण ?, हे समजलं, अशी टीका शिवसेनेच्या अरविंद सावंतांनी केली. तर राज ठाकरेंचा भाजप गेम करत असल्याचा आरोप निलम गोऱ्हेंनी केलाय. ब्रृजभूषण यांना शांत करण्यासाठी भाजपकडून हालचाली सुरु झाल्यात. आता ब्रृजभूषण राज ठाकरेंच्या माफी मागण्यावर ठाम राहतात की, माघार घेतात हे कळेलच.