मुंबई: गोवा जिंकलं आता महाराष्ट्र जिंकायचा आहे, अशी गर्जना करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी डिवचलं आहे. फडणवीस गोवा जिंकून आलेत. त्यामुळे त्यांचं मनोबल वाढलं आहे. गोवा काय आहे हे त्यांना लवकर कळेल. गोवा काय हे पोर्तुगीजांना कळलं नव्हतं. इंग्रजांनाही कळलं नव्हतं. त्यानंतर अनेक वर्ष अनेक राजकीय पक्षांनाही गोवा कळला नाही. फडणवीसांनाही कळला नाही. त्यांना लवकरच गोवा कळेल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. भाजपने शिमग्याचा अर्थ समजून घ्यावं. भाजपने. त्या पद्धतीने रंग उधळावे. महाराष्ट्राचा रंग स्वाभिमान, अखंडता आणि एकोप्याचा आहे. हे समजून घ्यावं. सध्या कशावरून काय होईल. त्याबद्दल न बोललेलं बरं. इतकं राजकारण बिघडवून ठेवलं आहे. महाराष्ट्रातील सुसंस्कृतपणा महाराष्ट्रातील राजकारणातील विनोद आणि संवेदनशील मन त्यांनी बिघडवून ठेवलं हे वातावरण कधीच नव्हतं. ते दुर्देवाने भाजपने केलं आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला.