कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याने महाराष्ट्रात आजपासून (15 ऑगस्ट) अनेक नियमांमध्ये मोठी शिथिलता देण्यात आली आहे. कोरोना लसीचा दुसरा डोस घेऊन किमान 14 दिवस झालेल्या नागरिकांसाठी मुंबई लोकल पुन्हा खुली झाली आहे. तर हॉटेल, रेस्टॉरंट, दुकानं, विवाह सोहळे यांच्याबाबतही मोठा दिलासादायक निर्णय झाला आहे. मात्र मास्क, सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीतून लसवंत नागरिकांचीही अद्याप सुटका नाही. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात आवर्जून कोव्हिड परिस्थितीचा उल्लेख करताना लॉकडाऊनबाबत पुन्हा एकदा इशारा दिला. ऑक्सिजनचा पुरवठा ठरवून आपण शिथिलता देत आहोत. ज्यावेळी असं लक्षात येईल, की ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतोय, त्यावेळी आपल्याला नाईलाजाने लॉकडाऊन लावावं लागेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.