मुंबई : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपची गुलामगिरी नाकारली. त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा प्रस्ताव नाकारला. त्यामुळेच त्यांना ईडीचे बोलावणे आल्याचा आरोप ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनातून करण्यात आला आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी यावेळी, भाजप प्रवेशाची 2 वर्षांपूर्वीच आपल्याला ऑफर मिळाली होती. त्यावेळी जर मी तडजोड केली असती तर महाविकास आघाडीचे सरकार पडले असते, असा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. त्यावरून आता राज्यातलं राजकारण चांगलंच ढवळून निघालंय. यामुद्द्यावरून राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी पलवार केला आहे. तसेच त्यांनी देशमुखांना हे सांगायला दोन वर्षे लागली का असा सवाल केला आहे. तर त्याचवेळी त्यांनी बोलायला पाहिजे होतं, ज्यावेळी चौकशी सुरू असते त्यावेळी बोलत नाही त्यानंतर आता बाहेर आल्यावर असं बोलतात. त्यात काही तथ्य नाही असं म्हटलं आहे.