Shivsena | संजय दिना पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार दाखल
कल्याण-डोंबिवली परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने खासदार संजय दिना पाटील यांच्या कथित वक्तव्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाचे कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख अभिजीत सावंत यांनी डोंबिवली पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
कल्याण-डोंबिवली परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने खासदार संजय दिना पाटील यांच्या कथित वक्तव्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाचे कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख अभिजीत सावंत यांनी डोंबिवली पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
तक्रारीत संजय दिना पाटील यांनी कथितपणे “बॉम्बने उडवून टाकू” असा उल्लेख केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका लोकप्रतिनिधीकडून अशा प्रकारची भाषा वापरली जाणे अत्यंत गंभीर बाब असल्याचे नमूद करत संबंधित बॉम्बचा उल्लेख नेमका कोणत्या संदर्भात करण्यात आला, तसेच त्यामागील वस्तुस्थितीची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, संजय दिना पाटील यांनी “पाच हत्या” झाल्याचा उल्लेख केल्याचे सांगत त्या संदर्भातील घटनांची चौकशी करण्यात यावी, तसेच त्या प्रकरणांबाबत सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना आक्षेपार्ह आणि धमकीची भाषा वापरण्यात आल्याचा आरोप करत ठाकरे गटाने या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवला आहे. लोकशाही व्यवस्थेत माध्यमांची भूमिका महत्त्वाची असून पत्रकारांबाबत अशा प्रकारची भाषा अयोग्य असल्याचे पक्षाने म्हटले आहे.
यावेळी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी न्यायव्यवस्था आणि पोलीस यंत्रणेवर विश्वास असल्याचे स्पष्ट करत कायदेशीर मार्गानेच लढा देणार असल्याचे सांगितले. तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, या तक्रारीमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले असून, या प्रकरणावर पुढे कोणती भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
