ठाणे : तुम्ही ठाणेकर असाल तर तुमच्यासाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. उन्हाळा आला की पाण्याची चणचण ही दरवर्षी भासते. धरणांचे पाणी आटले की त्या धरणाच्या माध्यमातून महापालिकांना होणारा पाणीपुरवठा कमी केला जातो आणि त्याची झळ नागरिकांना आणि सर्वसामान्यांना पोहचते. मात्र यंदाच्या वर्षी इतर महापालिका प्रमाणे ठाणे महानगर पालिकेकडून कुठलीही पाणी कपात होणार नाही. यावेळी ठाणे महानगर पालिकेकडून होणारा पाणी पुरवठा नियमित सुरू राहणार आहे. काही ठिकाणी पाइपलाइनच्या दुरुस्तीच्या कामासाठी काही काळ महापालिकेकडून शट डाऊन घेतला जात आहे. त्यामुळे काही दिवस नागरिकांना पाण्याची चणचण भासू शकते. मात्र पावसाळा तोंडावर आला असला तरी पाऊस आल्यानंतर धरणांच्या पाण्याची पातळी वाढण्यासाठी काही कालावधी जातो आणि त्यामुळे भविष्यात गरज पडल्यास पाणी कपात विषयी निर्णय घेतला जाऊ शकतो असे ठाणे महानगर पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले आहे.