मुंबई : अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाल्याची माहिती आहे. गेल्या तीन तासांत या चक्रीवादळाचा वेग ११ किलोमीटर प्रतितास झाला आहे. हे चक्रीवादळ आता उत्तरेच्या दिशेने पुढे सरकत असल्याची माहिती आहे. जसं जसं हे चक्रीवादळ पुढे सरकेल तसा पुढील १२ तासांत त्याचा वेग आणखी वाढणार आहे, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. तर भारतीय हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात ४ जिल्ह्यांना हा अलर्ट देण्यात आला आहे. पुढील ३ ते ४ तासात जळगाव, नाशिक, अहमदनगर, छ. संभाजीनगर या जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह वादळी पावासाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. परंतु हा पाऊस मान्सून नाही, यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी घाई करु नये. यासह मान्सून अजून केरळमध्ये दाखल झालेला नाही. दरवर्षी १ जून रोजी मान्सून केरळमध्ये येतो. यावर्षी ४ जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार होता. आता 8 जूनच्या आसपास केरळमध्ये मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.