मुंबई : शिवसेनेतून एकनाथ शिंदेसह अनेक आमदारांनी बंडाची भूमिका घेतल्यानंतर त्यांच्यावर गद्दार हा शिक्काच पडला होता. विशेषत: आदित्य ठाकरे यांनी तर गद्दार शिवाय या आमदारांचा उल्लेखच केला नाही. त्यामुळे शिंदे गट आणि शिवसेनेतील दरी ही वाढतच गेली. मात्र, याच गद्दार शब्दावरुन आता चांगलेच राजकारण पेटले आहे. बंड केलेल्या आमदारांनी क्रांती नाही तर शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे हे गद्दारच असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे तर दुसरीकडे ज्यांच्या क्रांतीची दखल जगभरातील 33 देशांनी घेतली ते गद्दार असूच शकत नसल्याचे अमृता फडणवीस यांनी सांगितले तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे सभागृहातील भाषण ऐकल्यानंतर ते गद्दार आहेत असे वाटत नसल्याचेही विधान अमृता फडणवीस यांनी केले आहे.