गेल्या काही दिवसांपासून राज्यावर कोरोनाचं भलंमोठं संकट आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं राज्यासह अनेक जिल्ह्यांत हाहाकार माजवलेला असून, कोरोना मृतांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या लाटेचा कहर थांबत नाही, तोच तिसऱ्या लाटेचे संकेत मिळत आहेत. अमरावती जिथून दुसरी लाट सुरू झाली, तिथे तिसरी लाट आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे अमरावतीकरांमध्ये भीती पसरली आहे. पेशानं चार्टर्ड अकाऊंटंट असलेल्या निखिल वाडिया यांनी ट्विटर करत ही माहिती दिलीय. त्यासाठी रुग्णसंख्येचा दिवसेंदिवस वाढत असलेला आलेखही दिलाय. तसेच अजूनही धोका टळलेला नसल्याचंही त्यांनी सांगितलंय.