तुकाराम मुंढेंच्या FDAच्या कारवाईवर फडणवीसांची स्पष्ट प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एफडीएच्या कारवाईवर समाधान व्यक्त केले आहे. अन्नभेसळीविरोधातील कठोर पावले जनतेच्या आरोग्यासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. अमेरिकेशी तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीवर चर्चा, पुणे मेट्रोच्या उद्घाटनासाठी पंतप्रधानांना निमंत्रण, तसेच महाराष्ट्र राज्याची जागतिक अर्थव्यवस्थेतील वाढती भूमिका आणि पुढील दोन वर्षांतील प्रगती यावरही त्यांनी प्रकाश टाकला.
राज्यात सध्या अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कारवायांची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्या धडक कारवाईची दखल आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घेतली असून, त्यांनी FDAच्या कामाचे कौतुक केले आहे.
तुकाराम मुंढे हे कडक, प्रामाणिक आणि बेधडक अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कारवाईच्या पद्धतीमुळे अनेक नागरिक त्यांना ‘सिंघम’ म्हणून संबोधत आहेत. गेल्या काही काळात त्यांनी अन्न आणि औषधांशी संबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली आहे.
या कारवायांबाबत प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी FDAच्या कामाचे समर्थन केले. ते म्हणाले, “लोकांचे आरोग्य धोक्यात असते. त्यामुळे त्यावर सक्त कारवाई करणे गरजेचे होते आणि ही कारवाई होत आहे. याचा मला आनंद आहे की अशा प्रकारची कारवाई सुरु आहे. ही एफडीएची कारवाई सतत होत राहणार आहे. FDAकडून सुरू असलेल्या कारवाईबाबत मला आनंद आहे.”
मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर तुकाराम मुंढे यांच्या कारवाईची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. FDAकडून अशाच प्रकारे कारवाई सुरू राहणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
