Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर…
मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर बोलताना मंत्री विखे पाटील यांनी अंतिम अहवाल आल्यानंतरच निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. १२ तारखेपूर्वी जरांगे यांचे उपोषण थांबवण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मराठा-कुणबी प्रमाणपत्रांबाबत सरकारची भूमिका अत्यंत प्रामाणिक असून, नियमानुसार शिबिरे लावून प्रमाणपत्रे दिली जात आहेत, असे त्यांनी नमूद केले.
मीरा रोड येथील सेवन स्क्वेअर शाळेने जैन धर्मीयांच्या पर्युषण पर्वाच्या काळात विद्यार्थ्यांना डब्यात कांदा, लसूण, बीटरूट आणि बटाटा यांसारखे जमिनीखाली उगवणारे पदार्थ आणण्यास मनाई केली आहे. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या मालकीच्या या शाळेने काढलेल्या या ‘फतव्या’मुळे नवा वाद निर्माण झाला आहे. शाळेच्या कॅन्टीनमध्येही हे पदार्थ दिले जाणार नाहीत असे पत्रकात नमूद केले आहे.
या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक पवित्रा घेतला. मनसे नेते अविनाश जाधव यांनी कार्यकर्त्यांसह शाळेच्या प्रवेशद्वारावर कांदा-लसूणच्या माळा घेऊन आंदोलन केले. शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी करत मनसेने हा धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले. धर्म घरात पाळावा, शाळांमध्ये धार्मिक गोष्टी आणू नयेत, असे आवाहन मनसेने केले.
आमदार नरेंद्र मेहता यांनी मात्र हे केवळ पर्युषण काळात अहिंसेच्या उद्देशाने केलेले एक नम्र आवाहन असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. यात कोणतीही सक्ती नसून, पालकांनी याला पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले. हा विषय उगाचच राजकीय रंग देऊ नये, अशी त्यांची भूमिका आहे.
