औरंगाबाद : औरंगाबादेतील क्रीडा विद्यापीठ पुण्यात हलवल्यास सत्ताधारी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार असल्याचा इशारा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिलाय. राज्यात शिवसेनेची सत्ता आहे. क्रीडा विद्यापीठ औरंगाबादेत व्हावे यासाठी शिवसेनेच्या माजी खासदारांनीही सरकारकडे पाठपुरावा करावा असं आवाहनही जलिल यांनी केलंय. देशात प्रथमच आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक क्रीडा विद्यापीठ सुरु करण्यात येत आहे. त्याची मुहूर्तमेढ महाराष्ट्रातील पुण्यातून रोवण्यात आली आहे. हे क्रीडा विद्यापीठ सुरुवातीला औरंगाबाद येथे सुरु करण्याचे प्रस्तावित होते. मात्र, विद्यमान सरकारने हे विद्यापीठ पुणे येथे हलवले. त्यानंतर आता हाच मुद्दा घेऊन एमआयएम आक्रमक झाली आहे. (we will not allow to move Aurangabad Sports University to Pune : Imtiyaz Jaleel)
औरंगाबाद येथे होणारे क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलवण्यात आल्याचा आरोप एमआयएमने केला आहे. याच मुद्द्याला घेऊन एमआयएमने औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 28 जुलै रोजी आंदोलन केले होते. यावेळी आंदोलनादरम्यान एमआयएमचे नेते कार्यकर्ते तसेच खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी गंभीर आरोप केले होते. मराठवाड्यातील खेळाडूंच्या विकासासाठी हे विद्यापीठ महत्त्वाचे मानले जात होते. मराठवाड्यातील खेळाडूंचे नुकसान होत आहे, असे एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय.
दुसरी महत्वाची बाब म्हणजे औरंगाबाद शहरातील बाबा पेट्रोल पंप ते चिकलठाणा दरम्यान सलग एकच फ्लायओव्हर रस्ता व्हावा याबाबत आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोललो असल्याचंही इम्तियाज जलील यांनी म्हटलंय. सध्या औरंगाबादेत तीन ओव्हर ब्रीज आहेत. त्यांना जोडून एकच वस फेस प्लायओव्हर व्हावा यासाठी एक्स्पर्ट एजन्सीकडून लवकर पाहणी होणार असल्याची माहिती जलील यांनी पत्रकार परिषदेत दिलीय.
मागील वर्षी खेलो इंडिया स्पर्धेच्यावेळी औरंगाबाद शहरात राज्यस्तरीय क्रीडा विद्यापीठ स्थापनेची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार क्रीडा खात्याकडे सरकारनं 120 एकर जागेचा ताबाही दिला. मात्र, राज्याचा अर्थसंकल्प जाहीर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची घोषणा केली. त्यामुळे औरंगाबादेतील क्रीडा विद्यापीठाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
औरंगाबाद शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या करोडी इथं क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा खेलो इंडिया स्पर्धेच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानंतर शासकीय पातळीवर जागेचं सर्वेक्षणही करण्यात आलं. करोडी इथं 120 एकर जागाही निश्चित करण्यात आली. ही जागा क्रीडा विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची घोषणा केली. त्यामुळे औरंगाबादेतील क्रीडा विद्यापीठाच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
संबंधित बातम्या
क्रीडा विद्यापीठावरुन एमआयएम आक्रमक, खेळाडूंसह कार्यकर्त्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
औरंगाबाद पालिकेचे मिशन भंगार हटाव, आतापर्यंत 21 बेवारस वाहने जप्त, 26 हजारांचा दंड
(we will not allow to move Aurangabad Sports University to Pune : Imtiyaz Jaleel)