‘राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा…,’ काय म्हणाले भुजबळ ?
नाशिकच्या भोंदूबाबाकडे अनेक लोक अंकज्योतिष पाहायला जात होते. त्यांच्याकडे मोठ - मोठी मंडळी येत होती. आता तपासातून सगळे बाहेर पडेलच. मात्र, अंधश्रद्धेपासून दूर राहिले पाहिजे असे माझे मत आहे असे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
अंधश्रद्धेपासून दूर राहिले पाहिजे असे माझे मत आहे. मंदिरे आहेत, मंदिरात तुम्ही ध्यानधारणा करा, योगा करा, प्राणायम करा, दर्शन घ्या, काही चांगले काम करणारे गुरुजी वगैरे आहेत जे समाजाची सेवा करतात. मात्र अशा लोकांमुळे चांगले काम करणारे लोक बदनाम होत आहेत अशी प्रतिक्रीया मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दिली आहे. यांच्याकडे सुद्धा बरीच मोठ- मोठी मंडळी येत होती. आता रुपाली चाकणकर या पुण्याच्या आहेत. ते बाबा नाशिकचे आहेत. त्यांनाही कोणीतरी घेऊन गेले असणारच ना असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.परंतू राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये असलेल्या लोकांनी या सर्वांच्या बाबतीत काही सीमा आखून ठेवल्या पाहिजेत. आपण जे काही करतो त्याचा परिणाम आम जनतेवर होत असतो. मंत्री जातात मग आपल्याला जायला काय हरकत आहे असे सर्वसामान्यांना वाटू शकते असेही भुजबळ यांनी म्हटले आहे. रुपाली चाकणकर यांच्या राजीनामा राजकीय निर्णय आहे. त्यांनी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा की नाही याचा निर्णय पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार घेतील असेही भुजबळ यांनी सांगितले आहे.
