अपघातवार ! राज्यात 2 विचित्र अपघातात 12 जण ठार, कुठे घडली दुर्घटना ?
पुण्याजवळ आज दोन भयानक अपघातांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत. नारायणगावजवळ झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला, तर जेऊरीजवळ झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला.

राज्यात आजचा शुक्रवार अपघात ठरला आहे. पुण्याजवळ घडलेल्या दोन विचित्र दुर्घटनांमध्ये आत्तापर्यंत12 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी आहेत. पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळ पहिला अपघात झाला असून त्यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला तर काही जखमींची प्रकृती गंभीर आहे. तर दुसरा अपघात हा आळंदी पंढरपूर पालखी महामार्गावर झाला असून त्यात तिघे ठार झाले आहेत. यामुळे एकच खळबळ माजली आहे. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळ आयशर टेम्पो प्रवासी वाहतूक करणारी मक्झिमो गाडी आणि एसटीमध्ये विचित्र अपघात झाला. आयशर टेम्पो हा ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना मॅक्झिमो प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीला जाऊन धडकला, आणि त्यामुळे मॅक्झिमो ही गाडी समोर उभ्या असलेल्या कोल्हापूर डेपोच्या एस टी बसला जाऊन धडकली. आयशर आणि बसच्या मध्ये मॅक्झिमा गाडीचा चक्काचूर झाला आणि त्यामधील 11 प्रवासी गंभीर जखमी झाले त्यातील सहा प्रवासी जागी मृत झाले. चार गंभीर जखमी वर नारायणगावमधील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांची सुद्धा प्रकृती चिंताजनक आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
जेजुरीजवळ अपघात, तिघे ठार
तर दुसरा अपघाता हा जेजुरीजवळ घडला आहे. आळंदी पंढरपूर पालखी महामार्गावर बेलसर फाटा जवळ एस.टी.बस व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकी वरील तिघे जण जागीच ठार झाले. रमेश किसन मेमाणे ( वय 60),संतोष दत्तात्रय मेमाणे (वय 40) व पांडुरंग दामोदर मेमाणे (वय 65) हे अशी मृतांची नावे असून ते तिघेही जण बोरमाळ वस्ती ,पारगाव मेमाणे ,ता पुरंदर जि पुणे येथील रहिवासी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सासवड जेजुरी रस्त्यावर बेलसर फाटा दरम्यान उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. दुचाकीवर असणारे तिघे जण रस्ता क्रॉस करून जात असताना एस टी बस व या दुचाकीचा अपघात झाला. ही घटना काल दुपारी साडे तीनच्या सुमारास घडली.
एस टी चालकाने गाडीचा वेग कमी करून बस रस्त्याच्या खाली घेण्याचा प्रयत्न केला मात्र दुचाकी गाडी बस खाली गेल्याने दुचाकीला फरफटत नेले. या अपघातात दुचाकी वरील तिघेजण जखमी झाले. तिघांना जेजुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिघांचा मृत्यू झाला. एकाच वस्तीवरील तिघांचा या अपघातात मृत्यू झाल्याने पारगाव मेमाणे गावावर शोककळा पसरली आहे.
मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य, मुख्यमंत्र्यांची घोषणा
या दोन्ही अपघातांचे वृत्त समजताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली आहे. मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात येईल. जखमींच्या उपचाराची योग्य काळजी घ्या, असे निर्देश पुणे पोलिस अधीक्षकांना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळ झालेल्या भीषण अपघातात 9 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो. मृतांच्या…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 17, 2025