Raigad Boat | हरिहरेश्वरच्या संशयित बोटीचा तपास नवी मुंबई एटीएस पथाककडे, बोटीवरील मुद्देमाल जप्त!
हरिहरेश्वर येथील समुद्र किनाऱ्यावर आलेल्या बोटीवर सुरुवातीला एका बॉक्समध्ये 3 एके 47 रायफल्स आणि 600 जिवंत काडतुसं आढळली.
मुंबईः रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर (Harihareshwar) समुद्र किनाऱ्यावर आलेल्या संशयित बोटीचा पुढील तपास नवी मुंबईच्या एटीएस (Mumbai ATS) पथकाकडे देण्यात आला आहे. या बोटीसंदर्भातील (Raigad Boat) पुढील तपास आता ही एटीएसची टीम करेल. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर रायगड समुद्र किनाऱ्यावर आलेल्या या बोटीमागे काही घातपाताचा संशय आहे का, अशी भीती व्यक्त केली जातेय. कृष्ण जन्माष्टमीच्या आदल्या दिवशी म्हणजेच 18 ऑगस्ट रोजी ही बोट हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर आली. गंभीर बाब म्हणजे या बोटीत तीन एके ४७ रायफल आणि ६०० जिवंत काडतुसं सापडली. मागील दोन दिवसांपासून राष्ट्रीय तपास यंत्रणा, कस्टम, एटीएस, क्राइम ब्रान्च तसेच स्थानिक पोलिस या तपासात लागले आहेत. दहशतवाद विरोधी पथकाकडे या तपासाची पूर्ण जबाबदारी देण्यात आली असून आज नवी मुंबई येथील एटीएस पथकाने हा तपास आपल्या हाती घेतला. या बोटीवर आढळलेला सर्व मुद्देमाल पथकाने जप्त केला असून हे पथक आता मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे.
बोटीवर काय आढळले?
हरिहरेश्वर येथील समुद्र किनाऱ्यावर आलेल्या बोटीवर सुरुवातीला एका बॉक्समध्ये 3 एके 47 रायफल्स आणि 600 जिवंत काडतुसं आढळली. मात्र या शस्त्रास्त्रांवर लावलेल्या स्टिकर्सवरून ही बोट आणि शस्त्रे नेमकी कुठून आली, याचा शोध घेता आला. प्राथमिक तपासानुसार, ओमानमधील एका सिक्युरिटी एजन्सीची असल्याचे म्हटले जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी दिलेल्या माहितीनुसार, या बोटीची मालकी एका ऑस्ट्रेलियन महिलेची आहे. जून 2022 मध्ये बी बोट युरोपच्या दिशेने निघाली होती. मात्र मार्गात बिघाड झाला. रेस्क्यू ऑपरेशनमध्ये बोटीवरील खलाशांना वाचवण्यात आलं मात्र बोटीचं टोइंग करण्यात अपयश आलं. हरिहरेश्वर येथे आलेली बोट, हीच असल्याचं सांगण्यात येतंय. तरीही बोटीसंदर्भातील सर्व संदिग्धतांचा कसून तपास करण्यात येतोय.
बोटीवर तलवारी आणि चाकूही…
गुरुवारी प्राथमिक तपासात या बोटीवर 3 एके 47 रायफल्स आणि 600 जिवंत काडतुसं सापडली होती. त्यानंतर काल शुक्रवारी एटीएस पथकाने अधिक तपास केला असता यावर दोन तलवारी आणि चाकूदेखील सापडले. बोटीतून ही शस्त्र भारतापर्यंत येण्यामागे काही कटकारस्थान आहे का, याच्या सर्व शक्यता पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथकाच्या वतीने तपासण्यात येत आहेत. संशयित बोटीच्या पार्श्वभूमीवर कोकण आणि पुणे तसेच मुंबईतही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.