जनतेने झुगारले ईडीचे आरोप; ईडी आणि सीबीआयचे कथित आरोपी पोहोचले संसदेत
Lok Sabha Election 2024 : काही नेत्यांमागे ईडीच्या चौकशीचा फेरा सुरू होता. त्यांनी लोकसभा निवडणूक लढविली. इतकेच नव्हे तर त्यांची ईडी चौकशी सुरु असतानाही जनतेने त्यांना भरभरून मते देत विजयी करुन लोकसभेत पाठविले. कोण आहेत ते विजयी खासदार चला जाणून घेऊ...

लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी म्हणजे साधारण वर्षभरापासून देशभरातील नेत्यांवर दोन एजन्सींच्या धाडी पडत होत्या. विशेष म्हणजे हे सर्व नेते भाजप विरोधातील नेते होते. ज्यांनी त्या एजन्सींच्या कारवाईला घाबरून भाजप पक्षात प्रवेश केला त्यांच्या कारवाया थांबल्या. या दोन एजन्सी म्हणजे अंमलबजावणी संचालनालय ( ईडी ) आणि सीबीआय. मात्र, ज्यांनी विरोध केला त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली. तुरुंगवास झाला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ही त्याची काही ठळक उदाहरणे. ईडीच्या चौकशीला, कारवाईला घाबरून अनेकांनी भाजपासमोर समर्पण केले. तर काही जण निर्भीडपणे त्याला समोर गेले. लोकसभा निवडणूक जाहीर झाली. त्यानंतरही काही नेत्यांमागे ईडीच्या चौकशीचा फेरा सुरूच होता. मात्र, त्या नेत्यांनी लोकसभा निवडणूक लढविली. इतकेच नव्हे तर त्यांची ईडी चौकशी सुरु असतानाही जनतेने त्यांना भरभरून मते देत विजयी करुन लोकसभेत पाठविले. कोण आहेत ते विजयी खासदार चला जाणून घेऊ…
ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी सात लाख मतांनी विजयी
टीएमसी प्रमुख, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांची ईडी चौकशी झाली आहे. पश्चिम बंगालमधील कथित शालेय नोकऱ्यांच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांची ईडीने जवळपास नऊ तास चौकशी केली होती. अभिषेक बॅनर्जी यांनी डायमंड हार्बर मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत अभिषेक यांनी भाजप उमेदवार अभिजित दास यांचा सात लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत 6,82,502 मतांच्या फरकाने विजयी झालेल्या CPI (M) चे माजी खासदार अनिल बसू यांचा 20 वर्षांचा विक्रम अभिषेक यांनी मोडला.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी चार लाख मतांनी विजयी
2022 मध्ये कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी पाच दिवस चौकशी केली होती. नॅशनल हेराल्ड संबधातील मनी लाँड्रिंग प्रकरणाशी त्यांचा काही संबंध आहे का, यावरून ही चौकशी करण्यात आली होती. नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र गांधी कुटुंब चालवते. राहुल गांधी यांनी रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढविली. तब्बल चार लाख मतांनी त्यांनी विजय मिळवला. मोठ्या मताधिक्यांच्या फरकाने ते निवडून आले. या विक्रमात त्यांनी आई सोनिया गांधी यांनाही मागे टाकले.
युपीचा नवा हिरो सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव
2019 मध्ये उत्तर प्रदेश राज्याच्या हमीरपूर जिल्ह्यातील बेकायदेशीर वाळू उत्खननाच्या कथित प्रकरणी सीबीआयने अखिलेश यादव यांना समन्स बजावले होते. सीबीआय एफआयआरच्या आधारे अंमलबजावणी संचालनालय (ईडी) देखील या प्रकरणी कथित मनी लाँड्रिंगची चौकशी करत आहे. मात्र, त्याच अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा सुपडा साफ केला. शिवाय कन्नौज लोकसभा मतदारसंघातून त्यांनी 1 लाख 70 हजार 922 मतांनी विजय मिळविला.
तृणमूल नेत्या महुआ मोईत्रा यांच्यावर जनतेचा पुन्हा विश्वास
संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावरही आरोप झाले होते. बेकायदेशीर प्रथांचा अवलंब केल्यामुळे त्यांना लोकसभा सदस्यत्व गमवावे लागले. मात्र, कृष्णनगर लोकसभा मतदार संघातून महुआ मोईत्रा यांना पुन्हा विजयी करत जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखविला आहे. भाजपच्या अमृता रॉय यांचा त्यांनी 56,705 मतांनी पराभव केला. मोइत्रा यांना 628,789 तर रॉय यांना 572,084 मते मिळाली.
दक्षिण मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई
ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत दक्षिण मध्य मुंबईचे ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांची मुंबई पोलिसांकडून सात तास चौकशी करण्यात आली होती. शिवसेना पक्ष फुटीनंतर शिवसेना पक्षाच्या खात्यातील 50 कोटी रुपये का काढले याची चौकशी पोलिसांनी केली होती. या चौकशीनंतर अनिल देसाई यांनी उमेदवारी अर्ज भरला. निवडणूक लढविली आणि ते निवडूनही आले. शिंदे गटाचे लोकसभेतील गटनेते आणि दोन वेळा खासदार असलेले राहुल शेवाळे यांचा त्यांनी पराभव केला.
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल
महादेव बेटिंग ॲप प्रकरणात ईडीने छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे नाव आरोपीच्या यादीत घातले होते. या प्रकरणातील एका आरोपीने बघेल यांना 524 कोटी रुपये दिल्याचा दावा केला होता. याच प्रकरणी भूपेश बघेल यांचे ओएसडी सौम्या चौरसिया यांना ईडीने डिसेंबरमध्ये अटक केली होती. भूपेश बघेल यांनीही लोकसभा निवडणूक लढविली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला.
आरोप प्रत्यारोपांचा राजकीय जीवनावर प्रभाव का नाही?
ज्या ज्या नेत्यांवर ईडी किंवा सीबीआयने कारवाई केली, चौकशी केली ते सर्व नेते या निवडणुकीत विजयी झाले. याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांच्याविरुद्ध एकही गुन्हा सिद्ध झालेला नाही. ईडी किंवा सीबीआयचा तपास अजून पूर्ण झालेला नाही. त्यातही सर्वात महत्त्वाचे म्हणजे भ्रष्टाचार हा निवडणुकीचा मुद्दा या निवडणुकीत नव्हता. बिलासपूरमधून केवळ भूपेश बघेल यांचा पराभव झाला. पण, भ्रष्टाचाराचे आरोप हे त्यांच्या पराभवाचे कारण नाही हे विशेष…
