असा विचार करणंच चुकीचं..; ‘धुरंधर’बद्दल अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
रणवीर सिंहच्या 'धुरंधर' या चित्रपटाबाबत अभिनेता अभिषेक बच्चनने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. आकड्यांच्या बाबतीत या चित्रपटाने सर्वांनाच मागे टाकलं आहे, असं त्याने म्हटलंय. अभिषेक नेमकं काय म्हणाला, ते जाणून घ्या..

रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व विक्रम मोडले आहेत. बॉलिवूडमधील उल्लेखनीय चित्रपटांपैकी हा एक ठरला आहे. या चित्रपटाच्या यशावर अनेक सेलिब्रिटींनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींना हा चित्रपट दमदार वाटला, तर काहींनी त्यात हिंसक दृश्यांचा भरणा असल्याचं म्हटलंय. आता अभिनेता अभिषेक बच्चनने या चित्रपटावर मोकळी प्रतिक्रिया दिली आहे. “भारतीय चित्रपटसृष्टी ही जगातील सर्वांत मोठी चित्रपटसृष्टी आहे. आपले आकडे इतके मोठे आहेत की, अरे आपण आपला स्क्विड गेम कधी तयार बनवणार असा विचार करणंच चुकीचं ठरेल. आपण धुरंधर बनवला आहे आणि त्याच्या कमाईच्या आकड्यांकडे एकदा पहा”, असं तो म्हणाला.
“धुरंधरच्या तिकिटांच्या विक्रीचा आकडाच पहा. हा कोणत्याही चित्रपटाला किंवा शोला सहज मागे टाकेल. त्यामुळे हा आकड्यांचा विषय आहे. कोरियन ड्रामा आणि चित्रपटांविषयी इतकं बोललं जातं, पण त्यांची व्ह्युअरशिप काय आहे, त्यांचे आकडे काय आहेत? भारतीय ज्या संख्येने चित्रपट पहायला जातात, त्या तुलनेत ते सर्व फिकं पडेल. त्यामुळे आपल्याकडे आकडे आधीपासूनच आहेत. त्यामुळे फॅड बनण्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारचे आकडे मिळवण्याचा प्रयत्न करत आहात? मला वाटत नाही की आपण फॅड बनू इच्छितो”, असं तो पुढे म्हणाला.
याआधी आमिर खानने ‘धुरंधर’च्या आकड्यांबद्दल वेगळी प्रतिक्रिया दिली होती. जर का हा चित्रपट 15000 थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला असता तर याहून कित्येक पटींनी अधिक कमाई झाली असली, असं मत अभिनेता आमिर खानने नोंदवलं होतं. “या चित्रपटाने 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. तुम्हीच विचार करा, जर हा चित्रपट 5000 स्क्रीन्सऐवजी 15000 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला असला, तर काय झालं असतं? कमाईचा आकडा आणखी जास्त असता. मी हेच सांगायचा प्रयत्न करतोय की खरा बदल तेव्हाच घडून येईल, जेव्हा स्क्रीन्सची संख्या वाढेल. कारण आपल्या देशात असे बरेच जिल्हे आहेत, जिथे सिंगल स्क्रीनसुद्धा नाही”, असं तो म्हणाला होता.
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट 5 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. यामध्ये रणवीरसोबतच संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि राकेश बेदी यांच्याही भूमिका आहेत.
