अनन्या पांडेच्या भरतनाट्यम डान्सवरून सोशल मीडियात वाद; चंकी पांडे यांनी दिले स्पष्टीकरण
भरतनाट्यम डान्समुळे सोशल मीडियावर ट्रोल होत असलेल्या अनन्या पांडेच्या मदतीला चंकी पांडे. ट्रोल करणाऱ्यांना दिलं खास उत्तर. नेमकं काय म्हणाले?

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिच्या ‘Chaand Mera Dil’ या चित्रपटातील एका डान्स सीनमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आली आहे. चित्रपटातील भरतनाट्यम फ्युजन परफॉर्मन्सचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर टीका केली. काही प्रसिद्ध भरतनाट्यम कलाकारांनी या सादरीकरणाला दुःखद आणि विनाशकारी असेही म्हटले. या संपूर्ण वादावर आता अनन्याचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते चंकी पांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
चंकी पांडे यांनी मुलगी अनन्याचे समर्थन करताना लोक या परफॉर्मन्सचा चुकीचा अर्थ लावत असल्याचे म्हटले. एका मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केले की, हा परफॉर्मन्स कधीही शुद्ध भरतनाट्यम म्हणून दाखवण्यात आलेला नव्हता. हा एक फ्युजन डान्स होता, जसा कॉलेजमधील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी सादर करतात.
ते पुढे म्हणाले की, पारंपरिक भरतनाट्यम शिकण्यासाठी जवळपास 20 वर्षांची मेहनत, शिस्त आणि सातत्य आवश्यक असते. हा नृत्यप्रकार अत्यंत तांत्रिक आणि सूक्ष्म बारकाव्यांनी भरलेला आहे. मात्र चित्रपटात दाखवण्यात आलेला डान्स हा पारंपरिक भरतनाट्यम आणि आधुनिक डान्स स्टाइल्सचा संगम होता. लोकांनी पूर्ण चित्रपट पाहून संदर्भ समजून घेतल्यानंतरच मत बनवावे असे आवाहनही त्यांनी केले.
‘चांद मेरा दिल’ या चित्रपटात अनन्या पांडे ‘चांदनी’ ही भूमिका साकारत आहे. चित्रपटातील कथेनुसार तिची आई भरतनाट्यम नृत्यांगना असते. कथा इंजिनिअरिंग कॉलेजच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. एका दृश्यात चांदनी पारंपरिक भरतनाट्यमऐवजी हिप-हॉप आणि लॉकिंग स्टाइल्ससोबत फ्युजन डान्स सादर करते. हाच सीन सोशल मीडियावर वादाचे कारण ठरला.
चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद
अनेक भरतनाट्यम कलाकार आणि नृत्यप्रेमींनी या परफॉर्मन्सवर नाराजी व्यक्त केली. त्यांचे म्हणणे आहे की, भरतनाट्यममधील भाव, तंत्र आणि गहनता या सादरीकरणात योग्य पद्धतीने दिसून आली नाही. संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या आनंदा शंकर जयंत यांनी या परफॉर्मन्सची तुलना भूकंपाच्या वेळी सुरू असलेल्या लग्नाच्या संगीताशी केली असल्याचे सांगितले जात आहे.
चित्रपटाची कथा आरव आणि चांदनी या दोन कॉलेज विद्यार्थ्यांच्या नात्यावर आधारित आहे. मोठे होत असताना त्यांना नातेसंबंध आणि जबाबदाऱ्यांचा सामना कसा करावा लागतो हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.
