राखी सावंतच्या अडचणीत वाढ, समीर वानखेडेंकडून खटला दाखल, काय आहे प्रकरण ?
राखी सावंत आणि वाद हे काही नवे समीकरण नाही. मात्र यावेळेस राखी सावंत चांगलीच अडचणीत सापडली आहे. नार्कोटिक्स ब्यूरोचे (NCB) माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी राखी आणि तिच्या वकिलाविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे
मुंबई | 20 मार्च 2024 : राखी सावंत आणि वाद हे काही नवे समीकरण नाही. अतर्क्य कपडे, फॅशन, किंवा विचित्र वक्तव्य करून, अतर्क्य भूमिका मांडून दरवेळेस लाइमलाइटमध्ये कसं रहायचं हे तिला चांगलंच माहीत आहे. मात्र यावेळेस राखी सावंत चांगलीच अडचणीत सापडली आहे. अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खानला ड्रग प्रकरणात अटक झाल्यानंतर चर्चेत आलेले नार्कोटिक्स ब्यूरोचे (NCB) माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्यामुळे राखी सावंतच्या अडचणीत वाढ झाली आहे. समीर वानखेडे यांनी राखी सावंत आणि तिच्या वकिलाविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. राखी आणि तिचे वकील अली काशिफ खान यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करत समीर वानखेडे यांनी 11 लाख रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे.
काय आहे प्रकरण ?
समीर वानखेडे यांनी मुंबईतील दिंडोशी शहर दिवाणी न्यायालयात हा खटला दाखल केला आहे. आपली प्रतिमा डागाळण्याचा आणि बदनामीचा प्रयत्न केला असा आरोप समीर वानखेडे यांनी केला आहे. राखी सावंत आणि तिचा वकील अली काशिफ खान या दोघांनी आपली प्रतिमा डागाळण्याचा आणि आपली बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचे गंभीर आरोप समीर वानखेडे यांनी लावले आहेत. आरोप समीर यांनी केलेत. त्यांनी केलेल्या याचिकेत हे आरोप नमूद करण्यात आले आहेत.
राखी सावंतच्या वकिलांचं म्हणणं काय ?
रिपोर्ट्सनुसार, समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याबाबत राखी सावंतचे वकील ॲड. अली काशिफ खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. म्हणाले, ‘जनतेच्या भल्यासाठी सत्य बोलल्यास बदनामी होत नाही, कायद्याचा अर्थ असा आहे की. आयपीसीच्या कलम 499 मधील दुसरा अपवाद म्हणजे ‘पब्लिक कंडक्ट ऑफ पब्लिक सर्व्हंट्स’, म्हणजेच एखाद्या सार्वजनिक सेवकाच्या सार्वजनिक कार्यात त्याच्या वागणुकीबद्दल किंवा चारित्र्याबद्दल सद्भावनेने मत मांडले गेले तर त्याची बदनामी, मानहानी होत नाही’ असे ॲड. खान यांनी सांगितले. आम्ही या प्रकरणी चोख प्रत्युत्तर देऊ असेही ते म्हणाले. दरम्यान यासंदर्भात राखी सावंतने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.