गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान ‘गॅलेक्सी अपार्टमेंट्स’ सोडून जाणार? अरबाजची प्रतिक्रिया..

| Updated on: Apr 26, 2024 | 4:44 PM

सलमानला घाबरवण्यासाठी बिष्णोईकडून आरोपींना गोळीबाराची जबाबदारी देण्यात आली होती. यासाठी दोन्ही आरोपींना आधी एक लाख रुपये मिळाले होते, अशी माहिती चौकशीत समोर आली आहे. काम फत्ते झाल्यानंतर आरोपींना आणखी तीन लाख रुपये मिळणार होते.

गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान गॅलेक्सी अपार्टमेंट्स सोडून जाणार? अरबाजची प्रतिक्रिया..
Salman and Arbaaz Khan
Image Credit source: Instagram
Follow us on

काही आठवड्यांपूर्वी अभिनेता सलमान खानच्या वांद्रे इथल्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट्स’बाहेर दोन अज्ञातांनी गोळीबार केला. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. या गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान हा त्याचे वडील सलीम खान आणि आई सलमा खान यांच्यासोबत मिळून पनवेल इथल्या फार्महाऊसमध्ये राहायला जाणार असल्याची चर्चा होती. सुरक्षेखातर सलमान हे पाऊल उचलू शकतो, असं म्हटलं जात होतं. सध्या सलमान ‘गॅलेक्सी अपार्टमेंट्स’मध्ये राहत असून चाहते अनेकदा त्याची एक झलक पाहण्यासाठी घराबाहेर गर्दी करतात. आता सलमान घर सोडून दुसरीकडे राहायला जाणार असल्याच्या चर्चांवर भाऊ अरबाज खानने मौन सोडलं आहे.

‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत अरबाज म्हणाला, “असं केल्याने तुम्हाला वाटतं का की ते प्रकरण संपेल? उद्या जर तुम्ही तुमचं लोकेशन बदललं, तर येणारा धोका निघून जाईल असं तुम्हाला वाटतं का? जर असं घडणार असेल तर कोणीही तसं करेल. पण खरी परिस्थिती अशी नाही. जागा बदलली तरी संकट टळणार नाही. त्यामुळे सावधगिरी बाळगण्यासाठी तुम्ही अशीच जागा बदलत राहणार का?” सलमान आणि अरबाजचे वडील आणि दिग्गज पटकथालेखक सलीम खान हे गेल्या अनेक दशकांपासून त्या घरात राहत आहेत. सलमाननेसुद्धा त्या घरात बराच काळ घालवला आहे, असं अरबाजने सांगितलं.

“कोणीच असं म्हणत नाही की ही जागा सोडा आणि आम्ही तुमचा पाठलाग सोडू. हे तसं प्रकरणच नाही. अशा परिस्थितीत आपण इतकंच करू शकतो की सावधगिरी बाळगायची. वैयक्तिकरित्या आणि सरकारकडून तुम्हाला जी सुरक्षा पुरविली जाईल, त्याआधारे तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. यासोबतच तुम्हाला शक्य तितकं सर्वसामान्य आयुष्य जगावं लागेल. जर एखादी व्यक्ती अशा घटनांमुळे सतत भीतीच्या छायेत असेल तर ती घराबाहेरसुद्धा पडू शकणार नाही” असं अरबाज पुढे म्हणाला.

हे सुद्धा वाचा

14 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास सलमानच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला. यावेळी सलमान आणि त्याचे कुटुंबीय घरातच होते. सुदैवाने या गोळीबारात कोणालाही दुखापत झाली नाही. सागर पाल आणि विकी गुप्ता या दोघांना पोलिसांनी याप्रकरणी अटक केली होती. चौकशीदरम्यान या दोघांनी बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. सलमानच्या घराबाहेर एक-दोन नाही तर दहा राऊंड फायरिंग करण्याचा आदेश मिळाल्याचाही खुलासा त्यांनी चौकशीदरम्यान केला. दोन्ही शूटर्सना गोळीबार करायचे आदेश होते. मात्र पकडले जाण्याच्या भीतीमुळे फक्त एकानेच गोळीबार केला होता. याप्रकरणी आतापर्यंत दहा जणांचे जबाब नोंदवले गेले आहेत.