घरातूनच काम मिळत नाही, बाहेरच्यांकडून काय अपेक्षा? केदार शिंदेंच्या भावाचा मोठा खुलासा
केदार शिंदे यांचा भाऊ मंदार शिंदे हे मनोरंजन क्षेत्रातील एकेकाळचे नावाजलेले नाव होते. पण सध्या ते एका व्यापाऱ्याकडे ड्रायव्हरचे काम करत आहेत. दरम्यान, त्यांनी एका मुलाखतीमध्ये केलेल्या खुलाशाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

मंदार शिंदे, हे मराठी मनोरंजन क्षेत्रातील एकेकाळचे नावाजलेले दिग्दर्शक आहेत. ते सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांचे धाकटे भाऊ असून, लोकशाहीर शाहीर कृष्णराव साबळे यांचे नातू आहेत. एकेकाळी मराठी मालिका आणि चित्रपटांच्या दिग्दर्शनातून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या मंदार शिंदे यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. यामुळे ते मनोरंजन क्षेत्रापासून दूर गेले आणि आज त्यांना स्वतःचे घर चालवण्यासाठी ड्रायव्हरची नोकरी करावी लागत आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मंदार शिंदे यांनी आपल्या जीवनातील अनेक कटू सत्य उघड केले. ते म्हणाले, “मी जर चांगला दिग्दर्शक नसतो, तर इतक्या मालिका मी दिग्दर्शित केल्या असत्या का? ज्या चॅनेलवर प्रसारित होत होत्या, त्यांच्या TRPमध्ये वाढ झाली होती. पण हे सगळे यश फक्त कलाकारांचे आहे का? कॅमेऱ्यामागे बसलेला दिग्दर्शक काही नव्हता? राग येतो, पण सांगायचे कोणाला?”
ते पुढे म्हणाले, “सध्या मी एका व्यापाऱ्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करतो. सुरुवातीला हे स्वीकारणे कठीण गेले, पण घर चालवण्यासाठी हे करावे लागले. नशीब कधी टोकावर नेते, तर कधी अचानक खाली फेकते.”
या मुलाखतीमध्ये मंदार शिंदे यांनी त्यांच्या आयुष्यातील एक किस्सा सांगितला आहे. “केदारदादांना एक मालिका मिळाली. त्यांनी मला बोलावले, ‘काय करतोयस? ये शूटिंगला.’ तिथे माझे काम होते – कलाकारांच्या कपड्या-चपला न्यायच्या आणि त्यांना द्यायच्या. त्यासाठी १०० रुपये मिळायचे. नंतर मला एक चित्रपट दिग्दर्शित करण्याची संधी मिळाली, पण ४-५ दिवसांतच निर्मात्याने तो उतरवला. तेव्हापासून माझे काम पूर्णपणे थांबले.”
मंदार शिंदे यांनी मराठी इंडस्ट्रीतील ‘कंपूशाही’वरही टीका केली. ते म्हणाले, “इथे घरातूनच काम मिळत नाही, तर बाहेरच्या लोकांकडून काय अपेक्षा करायची? कलाकार कितीही हुशार असला, चांगले काम करत असला तरीही त्याला काम देत नाहीत. ही इंडस्ट्रीत आजही असलेली समस्या आहे.” मागील काळात मंदार शिंदे यांनी अनेक लोकप्रिय मालिका, चित्रपट आणि मोठे इव्हेंट्स दिग्दर्शित केले होते. त्यांनी ‘जत्रा’, ‘अगंबाई अरेच्चा!’ सारख्या गाजलेल्या मराठी चित्रपटांच्या निर्मितीतही महत्त्वाची भूमिका बजावली होती. आजही ते स्वाभिमानाने जीवन जगत आहेत आणि आपल्या अनुभवांमधून इंडस्ट्रीतील वास्तव समोर आणत आहेत.
