भाऊ वडिलांच्या पार्थिवाला अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या खुर्चीत बसून..; प्रसाद ओकने सांगितला ‘तो’ कठीण प्रसंग
अभिनेता प्रसाद ओकने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आयुष्यातील कठीण प्रसंगाविषयी सांगितलं. कोरोना काळात बायो-बबलमध्ये शूटिंग करताना प्रसादच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यावेळी प्रसाद त्यांच्या अंत्यविधीलाही पोहोचू शकला नव्हता.
![भाऊ वडिलांच्या पार्थिवाला अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या खुर्चीत बसून..; प्रसाद ओकने सांगितला 'तो' कठीण प्रसंग भाऊ वडिलांच्या पार्थिवाला अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या खुर्चीत बसून..; प्रसाद ओकने सांगितला 'तो' कठीण प्रसंग](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/Prasad-Oak.jpg?w=1280)
कोरोना काळात लॉकडाऊन असताना अनेक चित्रपट आणि मालिकांचं शूटिंग बायो-बबलमध्ये करण्यात आलं होतं. कोरोनाची पहिली लाट येऊन गेल्यानंतर सरकारने बायो-बबलमध्ये शूटिंग करण्यास परवानगी दिली होती. अशाच बायो-बबलमध्ये सर्व कडक नियम पाळून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोचं शूटिंग सुरू होतं. या शूटिंगदरम्यानचा एक कठीण प्रसंग अभिनेता प्रसाद ओकने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितला. कोरोना काळातच प्रसादने त्याच्या वडिलांना गमावलं होतं.
बायो-बबलमध्ये शूटिंग
‘कॉकटेल स्टुडिओ’ या युट्यूब चॅनलच्या ‘इनसाइडर्स’ कार्यक्रमात प्रसाद त्याविषयी व्यक्त झाला. “कोरोनाची पहिली लाट येऊन गेल्यानंतर आपण सगळेच एका अनामिक भीतीत जगत होतो. कोरोनाची थोडी झळ कमी झाल्यानंतर सरकारने बायो-बबलमध्ये शूटिंग करण्याची परवानगी दिली होती. पण त्यासाठी मुंबईबाहेर जाणं गरजेचं होतं. बायो-बबलमध्ये शूट करताना युनिटमधील एकही माणूस त्या जागेतून बाहेर जाणार नाही आणि नवा माणूस आत येणार नाही. अशा कडक नियमांमध्ये आम्ही काम करत होतो. या शूटिंगसाठी महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचं युनिट मुंबईबाहेर दमणला पोहोचलं होतं”, असं त्याने सांगितलं.
कोरोना काळात वडिलांचं निधन
“दमणमधील एका हॉटेलमध्ये शोचा सेट उभारला गेला होता आणि तिथेच शूटिंग करण्यात येणार होती. 29 एप्रिलला आम्ही दमणला पोहोचलो. त्यानंतर 30 एप्रिल रोजी पहिल्या एपिसोडचं शूटिंग सकाळी 9 वाजता सुरू होणार होतं. आम्ही सकाळी 6-7 वाजता उठलो. मी उठून फ्रेश झाल्यावर फोन बघितला तर बायकोचे आठ ते दहा मिस्ड कॉल होते. तिला फोन करताच मला समजलं की माझे वडील गेले. पुण्यात माझे खूप चांगले मित्र आहेत. एका मित्राच्या माध्यमातून मी पुण्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांना मी विचारलं की आपण काय करू शकतो? तर ते म्हणाले, साहेब परिस्थिती खूप वाईट आहे. पार्थिव अर्धा-पाऊण तास ठेवण्याची आम्हाला परवानगी आहे. तुम्हाला दमणहून पुण्याला यायला किमान सहा ते सात तास लागतील. आम्ही एवढा वेळ प्रतीक्षा करू शकत नाही. परिस्थिती खूप बिकट आहे. मी काहीच करू शकत नाही”, असं तो पुढे म्हणाला.
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/Rupali-Ganguly.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/rupali-ganguly-and-ranveer-allahbadia.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/manisha-koirala-1.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/Samantha-and-Naga-Chaitanya.jpg)
अंत्यविधीला पोहोचू शकला नाही प्रसाद
कोरोनामुळे प्रसाद त्याच्या वडिलांच्या अंत्यविधीला पोहोचू शकला नव्हता. त्यावेळी त्याने भावाला व्हिडीओ कॉलद्वारे वडिलांना अखेरचं पाहण्याची विनंती केली. मात्र नियमांमुळे तेही शक्य झालं नव्हतं. वडिलांजवळ असलेल्या प्रसादच्या भावाला तिथे मोबाइल नेण्याची परवानगी नव्हती आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही व्हिडीओ कॉल करण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे प्रसाद त्याच्या वडिलांना शेवटचं पाहूच शकला नव्हता. “थोड्या वेळाने भाऊ तिथे वडिलांच्या पार्थिवाला अग्नी देत होता आणि मी इथे हास्यजत्रेच्या खुर्चीत बसून स्किट बघत होतो”, अशा शब्दांत प्रसादने भावना व्यक्त केल्या.