तू, मी अन् ‘देऊळ बंद 2’ म्हणत पत्नीची प्रवीण तरडेंसाठी भावनिक पोस्ट, शेअर केले न पाहिलेले फोटो
‘देऊळ बंद 2’च्या यशाने भारावल्या स्नेहल तरडे; भावनिक पोस्ट करत चित्रपटाच्या सेटवरील शेअर केले Unseen फोटो आणि कॅप्शनद्वारे व्यक्त केल्या भावना.

Deool Band 2 : मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळ बंद 2 – आता परीक्षा देवाची’ हा सिनेमा सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून बॉक्स ऑफिसवरही दमदार कामगिरी करताना दिसत आहे. अध्यात्म, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलाशक्ती आणि समाजातील वास्तववादी मुद्दे यांची प्रभावी मांडणी करणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तब्बल 11 वर्षांनंतर प्रदर्शित झालेल्या या सिक्वेलने प्रेक्षकांच्या मनात पुन्हा एकदा खास स्थान निर्माण केलं आहे.
या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्यासह स्नेहल तरडे यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. चित्रपटाला मिळत असलेल्या प्रेमामुळे संपूर्ण टीम आनंदित झाली असून विशेषतः प्रवीण तरडे आणि स्नेहल तरडे यांनी प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा पूर्ण झाल्यानिमित्त स्नेहल तरडे यांनी सोशल मीडियावर एक खास आणि भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी ‘देऊळ बंद 2’च्या सेटवरील काही खास फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. या पोस्टमध्ये त्यांनी प्रवीण तरडे यांच्यासोबतच्या नात्याबद्दल, कलेवरील प्रेमाबद्दल आणि या चित्रपटामागील सामाजिक उद्देशाबद्दल मनमोकळेपणाने लिहिलं आहे.
स्नेहल तरडेंच्या पोस्टमध्ये काय?
स्नेहल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, ‘तू, मी आणि ‘देऊळ बंद 2’… हा सिनेमा प्रदर्शित होऊन एक आठवडा पूर्ण झाला. चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून मन भरून आलं आहे. आपण दोघंही कलेवर मनापासून प्रेम करणारी माणसं आहोत. स्वामींनी आपल्याला एकत्र आणलं आणि त्या प्रेमातून काहीतरी वेगळं, समाजासाठी उपयुक्त घडवण्याची प्रेरणा दिली. या चित्रपटाच्या माध्यमातून समाजातील अनेक ज्वलंत प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांच्या समस्या, देवावर वाढणारी अश्रद्धा, महिलांचे संघर्ष आणि समाजातील वास्तव या गोष्टी प्रामाणिकपणे लोकांसमोर आणायच्या होत्या. फक्त मनोरंजन न करता समाजाला विचार करायला लावणारा सिनेमा बनवण्याचा आमचा प्रयत्न होता.
View this post on Instagram
स्नेहल तरडे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये चित्रपटाच्या निर्मात्यांच्या सामाजिक उपक्रमाचाही उल्लेख केला. त्यांनी सांगितलं की, चित्रपटातून मिळणाऱ्या नफ्याचा काही हिस्सा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत करण्यासाठी वापरण्याचा विचार करण्यात आला आहे. हा उपक्रम स्वामींच्या कृपेनेच शक्य होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. पोस्टच्या शेवटी त्यांनी स्वामी समर्थांप्रती कृतज्ञता व्यक्त करत, स्वामी महाराजांची कृपा अशीच आमच्यावर कायम राहो अशी प्रार्थना केली आहे.
