ना 18 कोटीचा टोल, ना डील..इराणला ऐकावचं लागलं, हॉर्मुझमधून भारताने अशी बाहेर काढली आपली जहाजं, समोर आली Inside Story
स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ पार करणं सध्या कुठल्याही देशाच्या जहाजांसाठी सोपं नाहीय. इराणने टोल आणि डील अशा दोन अटी ठेवल्या आहेत. पण भारताने यापैकी कुठलीही अट मान्य न करता आपली जहाजं तिथून कशी बाहेर काढली, त्याची इनसाइड स्टोरी आता समोर आली आहे. इराणला सुद्धा भारताच ऐकावचं लागलं.

इराण आणि अमेरिकेमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ चर्चेत आहे. इराण आपल्या सुविधेनुसार मालवाहू जहाजांना मार्ग पार करण्याची परवानगी देत आहे. जहाजांना मार्ग देण्यासाठी इराणने दोन अटी ठेवल्या आहेत. एक डील आणि दुसरा टोल. या अटींतर्गत चीन, मलेशिया आणि पाकिस्तानच्या मालवाहू जहाजांनी हॉर्मुझ पार केलय. भारताने या मार्गावरुन आपली तीन जहाजं आणली. पण यासाठी भारताने कुठलीही डील केली नाही किंवा टोल टॅक्स दिला नाही. ब्लूमबर्गने या संदर्भात परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांच्या हवाल्याने एक वृत्त दिलं आहे. यानुसार भारताने तेल आणि गॅसने भरलेली आपली जहाजं काढण्यासाठी कूटनितीचा मार्ग अवलंबला. अयातुल्ला अली खामेनेई यांच्यासाठी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या शोक सभेत भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री सहभागी झाले होते.
रिपोर्टनुसार सुरुवातीला भारतासाठी सुद्धा यातून सुवर्णमध्ये साधणं सोपं नव्हतं. कारण इराण भारताचा जुना मित्र देश आहे आणि अमेरिका-इस्रायल सोबत भारताचे संरक्षण आणि धोरणात्मक करार आहेत. अशावेळी कुठल्या एकाबाजूने आहोत असा संदेश जाणं भारताच्या हिताचं नव्हतं. खामेनेई यांच्या शोकसबेत विक्रम मिस्त्री सहभागी झाल्यानंतर भारताने चर्चेला गती दिली. स्वत: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्या काळात इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत तीन वेळा फोनवर चर्चा केली. त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: इराणचे राष्ट्रपती मसूद पजेशकियन यांच्याशी बोलले.
इराणसाठी हा मोठा झटका होता
त्याचं चर्चेतून हॉर्मुजचा मार्ग निघाला. नवी दिल्लीतील इराणच्या राजदूतांनी यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. त्यानंतर इराण सरकारने इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्डला भारतीय जहाजांसाठी मार्ग मोकळा करुन देण्याचे आदेश दिले. भारताने इराणी नौदलाच्या एका जहाजाला कोच्चीमध्ये थांबण्याची परवानी दिली. त्यानंतर चर्चेचे दरवाजे खुले झाले असं ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. कारण त्याच दिवशी श्रीलंकन समुद्रात इराणी युद्धनौका डेनाला अमेरिकी नौदलाने पाणबुडीद्वारे हल्ला करुन बुडवलं होतं. इराणसाठी हा मोठा झटका होता.
18 कोटी टोल आकारतायत
भारताने कोच्चीमध्ये इराणी जहाजाला थांबण्याची परवानगी दिली नसती, तर त्या जहाजावर सुद्धा अमेरिकेने हल्ले केले असते. इराणने स्थिती समजून घेतली आणि भारताची कूटनितीक चर्चा सुरु केली. भारतात जहाज आल्यानंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी स्टेटमेंट दिलं होतं. एक-एक टँकरला आणण्याची व्यवस्था केली जात आहे. इराणसोबत यासाठी कुठलाही करार केलेला नाही. सध्या इराण स्ट्रेट ऑफ हॉर्मुज पार करण्यासाठी जहाजांवर 18 कोटी रुपयापर्यंत टोल आकारत असल्याची बातमी आहे.
