लग्नानंतर नेमकं किती वर्षांनी संसार मोडण्याचा धोका सर्वाधिक? विवाहित लोकांनी नक्की वाचा
लग्नाच्या किती वर्षांनंतर सर्वाधिक घटस्फोट होतात? वैवाहिक आयुष्यात नेमका कोणत्या काळात संसार मोडण्याचा धोका सर्वात जास्त असतो, याबद्दल तज्ज्ञांनी दिलेली धक्कादायक माहिती नक्की वाचा.

विवाह हे आयुष्यभराचे आणि सर्वात मजबूत नाते मानले जाते. परंतु, बदलती जीवनशैली, बदलणारे विचार आणि जबाबदाऱ्यांमुळे आजकाल जोडप्यांमध्ये दुरावा निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहे. अलीकडच्या काळात लग्नसंस्थेत लग्न टिकवण्यापेक्षा ते मोडण्याचा प्रकार सातत्याने समोर येत आहे. सध्या बहुतांश ठिकाणी घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. लग्नानंतरचे कोणते वर्ष नात्यासाठी सर्वात कठीण परीक्षा पाहणारे ठरते, याबद्दल आता तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
सर्वाधिक घटस्फोटाचा धोका कोणत्या वर्षांत?
Marriage.com या विवाहविषयक संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, जोडप्यांमध्ये घटस्फोटाचा धोका लग्नाच्या पहिल्या २ वर्षांत आणि त्यानंतर ५ ते ८ वर्षांच्या दरम्यान सर्वाधिक असतो. वेगवेगळ्या संशोधनातून समोर आले आहे की, वैवाहिक नात्यासाठी ७ वे आणि ८ वे वर्ष हे सर्वात जास्त संवेदनशील आणि धोकादायक असते. तज्ज्ञ या परिस्थितीला ‘सेव्हन-इयर इच’ (Seven-Year Itch) असे म्हणतात.
या सिद्धांतानुसार, लग्नाला साधारण ७ वर्षे पूर्ण झाल्यानंतर अनेक जोडप्यांमध्ये एकमेकांबद्दलचे आकर्षण किंवा नात्यातील रस कमी होऊ लागतो. जरी हा नियम सर्वांनाच लागू होत नसला, तरी आकडेवारीनुसार या काळात घटस्फोटाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे.
नात्यामध्ये स्थैर्य कधी येते?
अभ्यासातील सकारात्मक बाजू अशी की, जे जोडपे लग्नाचा हा कठीण काळ (७ ते ८ वर्षे) यशस्वीपणे पार पाडतात, त्यांचे नाते पुढे टिकण्याची शक्यता खूप जास्त असते. लग्नाच्या ९ व्या ते १५ व्या वर्षाच्या दरम्यान नात्यात अधिक परिपक्वता, स्थिरता आणि समजूतदारपणा येतो. या काळात लोक आपल्या जोडीदाराचा स्वभाव, मुलांचे संगोपन, करिअर आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या योग्य प्रकारे हाताळण्यास शिकतात.
नातेसंबंध तुटण्यामागची मुख्य कारणे
कोणतेही नाते एका रात्रीत तुटत नाही, त्यामागे अनेक कारणे असतात. पैशांची कमतरता, वाढते कर्ज किंवा नोकरी जाणे यांमुळे नात्यात ताणतणाव निर्माण होतो. लग्नाच्या काही वर्षांनंतर पती-पत्नीचे भविष्याबद्दलचे दृष्टिकोन, करिअर किंवा कौटुंबिक उद्दिष्टे बदलल्यास मतभेद वाढतात. जोडीदाराकडून भावनिक आधार न मिळणे, फसवणूक, कौटुंबिक वाद आणि घरगुती हिंसाचार यामुळे नाती संपुष्टात येतात. कमी वयात लग्न होणे आणि लगेचच पालकत्वाची जबाबदारी अंगावर पडल्यानेही अनेक जोडप्यांमध्ये वाद होतात.
(टीप – ही माहिती विविध संशोधन आणि तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. यास वैद्यकीय किंवा कायदेशीर सल्ल्याचा पर्याय मानू नये.)
