पावसाळ्यात घराची दुरवस्था टाळायची आहे? मग आजच करा ही तयारी!
पावसाळा कितीही आनंददायी असला तरी त्याची तयारी नसेल, तर त्याचं संकट होऊ शकतं. त्यामुळे या काही दिलेल्या छोट्या-छोट्या उपाययोजना करून आपण घर सुरक्षित आणि सुसज्ज ठेऊ शकतो.

पावसाळा म्हणजे निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद लुटण्याचा काळ, पण याच पावसात घराची दुरवस्था होण्याची शक्यता सर्वाधिक असते. घरामध्ये गळती, भिंतींवर ओलसरपणा, भिंतींना फुगवटे, वायरिंगमध्ये बिघाड, असे अनेक प्राॅब्लेम्स पावसात उभे राहतात. त्यामुळे पावसाळा सुरू होण्याआधीच योग्य तयारी करून ठेवणे आवश्यक आहे. चला, पाहूया कोणकोणत्या गोष्टी आपण लक्षात घेतल्यास आपले घर सुरक्षित, स्वच्छ आणि पावसातही आरामदायक राहील.
1. पावसाळ्याची सुरुवात होण्यापूर्वी सर्वात महत्त्वाचं पाऊल म्हणजे घराच्या छताची तपासणी. छतावर कुठेही भेगा, जुना सिमेंट पडलेला, पाण्याचा साचलेला भाग असेल तर ते लवकरात लवकर दुरुस्त करणे गरजेचे आहे. वॉटरप्रूफ कोटिंग करून घेणं हा एक उत्तम पर्याय आहे. छपराची गळती ही भिंतींची आणि संपूर्ण घराची वाताहत करू शकते.
2. पावसाचे पाणी अनेकदा खिडक्या आणि दरवाजांमधून घरात झिरपतं. यासाठी त्यांच्या चौकटी तपासा. रबरी सीलिंग स्ट्रिप्स वापरून गॅप्स बंद करता येतात. लाकडी दरवाज्यांना वारंवार लाकूड संरक्षक द्रव्य (varnish) लावा, कारण पावसात लाकूड फुगते.
3. घराभोवतीची पाण्याचा निचरा करणारी व्यवस्था नीट कार्यरत आहे की नाही हे तपासा. गटारे, नाल्या, पाईपलाइन यामध्ये कचरा, पानं, प्लास्टिक अडकलेले असल्यास ते काढा. यामुळे पाणी साचणार नाही आणि डासांचा उपद्रव होणार नाही.
4. पावसात शॉर्ट सर्किट किंवा करंट लागण्याचा धोका वाढतो. त्यामुळे वायरिंग व्यवस्थित आहे का, सॉकेट्स ओलसर होणार नाहीत ना, या गोष्टी तपासून घ्या. गरज असल्यास वायरिंगचे नूतनीकरण करा. ईएलसीबी सर्किट ब्रेकर बसवणे हे देखील सुरक्षिततेसाठी उपयुक्त ठरते.
5. पावसाचे पाणी भिंतींमध्ये झिरपून ओलसरपणा निर्माण करतो. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच घराच्या बाहेरील भिंतींना वॉटरप्रूफ पेंट लावणे हा चांगला पर्याय आहे. यामुळे घराला दीर्घकाळपर्यंत संरक्षण मिळते.
6. पावसाळ्यात घरात ओलसरपणा वाढतो, म्हणून कपडे, कागदपत्रं, इलेक्ट्रॉनिक वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवा. सिलिका जेल पॅकेट्स किंवा नमावा शोषणारे पदार्थ कपाटात ठेवता येतात. घरात चटई, गालिचे यांचा वापर टाळा, कारण ते पाणी शोषून ठेवतात.
7. पावसात घरात झुरळं, मुंग्या, उंदीर यांचा त्रास होतो. पावसाळ्यापूर्वीच एकदा पेस्ट कंट्रोल करून घेतल्यास हे टाळता येते. स्वयंपाकघर आणि साठवणूक कक्ष विशेष लक्षात घ्या.
