आम्ही काय गोट्या खेळायला आलोय का ? शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर अजित पवार भडकले..
मराठवाड्याच्या ओल्या दुष्काळाची पाहणी करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पारा चढला आणि त्यांनी शेतकऱ्यालाच बोल सुनावले. त्यानंतर विरोधी पक्षाने अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

कधी नव्हे ते मराठवाड्यात पावसाने अक्षरश: धुमाकुळ घातल्यानंतर आता जागोजागी पुर आल्याने शेतकऱ्यांची दैनावस्था झाली आहे. अनेक जिल्ह्यातील गावांचा संपर्क तुटला आहे. शेतकऱ्यांनी ओला दुष्काळाची मागणी करीत नुकसान भरपाईची मागणी केली आहे. त्यामुळे कालपासून सरकारने घटनास्थळी जाऊन पाहणी दौरा सुरु केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार विविध जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. धाराशीव येथे अजित पवार शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले असता एका शेतकऱ्याने कर्जमाफीचा विषय काढताच अजित पवार त्याच्यावरच भडकले.
धाराशीव येथे उपमुख्यमंत्री अजित पवार पाहणी दौऱ्यासाठी आले होते. त्यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना एका शेतकऱ्याने कर्जमाफीचा विषय काढला. त्यावेळी अजित पवार यांचा तोल सुटला. आणि अजित पवार यांनी त्या शेतकऱ्यालाच फैलावर घेतले. अजित पवार यावेळी कर्जमाफीची मागणी करणाऱ्या शेतकऱ्याकडे पाहात म्हणाले याला द्यारे मुख्यमंत्री पद..आम्हाला कळतंय ना.आम्ही काय येथे गोट्या खेळायला आलोय..सकाळी ६ ला सुरु केलं भावा मी करमाळ्याला असे अजित पवार रागाने म्हणाले. जे काम करत ना..त्याची मारा आम्हालाही कळंत ना. आम्ही लाडक्या बहिणींना किती मदत केली. आज ४५ हजार कोटी वर्षाला मदत करतोय..शेतकऱ्यांची वीज माफी केली २० हजार कोटी भरतोय असेही पवार यावेळी म्हणाले. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय सगळी सोंग करता येतात. पण पैशाचे सोंग करता येत नाही असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले. परांडा येथे पाहणी करण्यासाठी अजित पवार आले असता हा प्रकार घडला.
तर सरकार चालवू नका- संजय राऊत
अजित पवार नेहमीच स्पष्टवक्तेपणाबद्दल ओळखले जातात. परंतू त्यांच्या अशा प्रकारच्या वक्तव्यांनी अनेकदा वाद निर्माण झालेले आहेत. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे मोठं संकट आहे. पैसा बिसा येथे महत्वाचा नाहीए…शेतकऱ्यांना मदत करताना हात आखडता घेणार नाही. थोडीशी काटकसर करावी लागेल ती आम्ही करु असेही शिंदे यांनी सांगितले आहे. आम्ही कुठे काटकसर केली का ? लाडक्या बहिणींना पैसे देताना काटकसर केली का ? कुठे वादळ आलं, संकट आलं तर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेच ना..अशी सारवा सारव नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
या विषयावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांना लक्ष्य केले आहे. पैशाचं सोंग करता येत नाही ना तर सरकार चालवू नका. ही वेळ महाराष्ट्रावर कोणी आणली ? तुम्ही वारंवार लाडक्या बहिणींचा उल्लेख करु नका ? लाडक्या बहिणींचे संसार यात वाहून गेले आहेत अशी टीका संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर केली आहे.
