अजितदादांचा अपघात झाला त्या विमानात मी स्वत:…, विमान अपघातावर पहिल्यांदाच फडणवीसांचा मोठा खुलासा
आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातावर मोठा खुलासा केला आहे.

अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. 28 जानेवारी रोजी अजित पवार यांचं विमान मुंबईवरून बारामतीला निघालं होतं. बारामतीच्या धावपट्टीवर उतर असताना विमानाचं नियंत्रण सुटलं आणि हे विमान थेट जमिनिला धडकलं, विमान जमिनिला धडकल्यानंतर घटनास्थळी मोठा स्फोट झाला आणि विमानाला आग लागली. या दुर्घटनेमध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान या अपघातावर काही जणांकडून वारंवार शंका उपस्थित करण्यात येत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या अपघातावर शंका उपस्थित केली आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी देखील या अपघातावर शंका उपस्थिती केली होती. विमान हवेत अचानक तिरकं कसं झालं? मी काही त्यातला तज्ज्ञ नाही, पण काहीतरी प्रॉब्लेम असावा असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील या अपघातावर शंका उपस्थित केली होती, विमानात बॉम्ब होता का? अशी शंका येते असं म्हणत अपघाताची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली, अमोल मिटकरी यांनी देखील या विमान अपघातावर शंका उपस्थित केली आहे. दरम्यान आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भातील प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना त्यांनी मोठा खुलासा केला आहे.
नेमकं काय म्हणाले फडणवीस?
पहिली गोष्ट अशी आहे की, अजितदादांचा जो काही दुर्दैवी अपघात झाला आहे, त्यामुळे सर्वच लोक शॉकमध्ये आहेत. कोणाचं दु:ख कमी आहे, आणि कोणाचं दु:ख जास्त आहे असं म्हणता येणार नाही, आणि मला वाटतं त्यांच्या कुटुंबाइतकं दु:ख कोणाला असूही शकत नाही, पण या अपघातामुळे सर्वजण दु:खी आहेत. हा जो अपघात घडला आहे, त्याची डीजीसीए मार्फत चौकशी सुरू आहे. आपण सीआयडी चौकशी सुरू केली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्हाला विनंती आली की, याची सीबीय चौकशी करा. शेवटी आपल्याला सर्व सत्य कळालचं पाहिजे. चौकशी सगळ्या गोष्टींची सुरू आहे. त्यामुळे आता चौकशीमधून काय समोर येतय त्याची वाट पाहिली पाहिजे.
कुणाच्या मनात शंका असू नये असं म्हणणारा मी नाही, मात्र शंका योग्य ऑथेरिटीकडे व्यक्त केली पाहिजे. डीजीसीएकडे शंकेचं पत्र द्यावं किंवा आमच्याकडे द्यावं, आम्ही ते डीजीसीएला देऊ. प्रत्येक शंकांचं उत्तर मिळालं पाहिजे, चौकशीची मागणी करणं चुकीचं नाही, केंद्र आणि डीजीसीएला यात लपवण्यासारखं काही नाही असं मला वाटतं. व्हिसीआर कंपनीच्या विमातून देशभरातली जवळपास सर्वच नेते प्रवास करतात. दादांचा अपघात झाला त्या विमानात मी स्वत: 4 ते 5 वेळा प्रवास केला आहे. अजितदादांचा अपमान होईल किंवा परिवाराला त्रास होईल अशा पद्धतीने कुणी वागू नये, असं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
